भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हे सामूहिक ध्येय ! – सुनील घनवट, संघटक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती

छत्तीसगडमध्ये हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची स्थापना

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या बैठकीला उपस्थित पदाधिकारी

दुर्ग (छत्तीसगड) – देशाच्या वर्तमान परिस्थितीत हिंदु धर्म, गोमाता, हिंदु माता-भगिनी, संस्कृती, मंदिरे, परंपरा यांच्यावर सातत्याने आघात होत असल्याने सर्व हिंदूंनी परस्पर समन्वय साधून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने एकत्रितपणे वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. याच उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली. दुर्ग येथील सुराणा महाविद्यालयातील प्रेक्षागृहात ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे दुर्ग-भिलाई जिल्हा संयोजक अधिवक्ता आशीष शर्मा, सर्व समाजाचे अध्यक्ष श्री. मेघराज यादव, रायपूर येथील श्री. आशीष परिदा, दुर्ग येथील श्री. प्रदीप सिन्हा, तसेच राजनांदगाव आणि रायपूर येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १४० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. समितीकडून राज्यभर हिंदूंना धर्म आणि राष्ट्र यांविषयी जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, आज जगात १५७ हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे, ५९ इस्लामी राष्ट्रे आणि १२ बौद्ध राष्ट्रे आहेत; परंतु कोट्यवधी लोकसंख्या असूनही हिंदूंचे स्वतंत्र राष्ट्र नाही, ही गंभीर गोष्ट आहे. जर आज आपण जागृत आणि संघटित झालो नाही, तर भविष्यात आपल्याला आपल्याच देशातून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते. ‘जो हिंदु हितासाठी कार्य करील, तोच देशावर राज्य करील’ या संकल्पाने पुढे जाण्याची वेळ आली आहे. चर्चा करण्यापेक्षा आता घटनात्मक मार्गाने प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे.

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या बैठकीला उपस्थित पदाधिकारी

संघटन आणि समन्वय यांवर भर

सर्व समाजाचे अध्यक्ष श्री. मेघराज यादव यांनी सांगितले की, हिंदु राष्ट्राच्या ध्येयासाठी छत्तीसगडमधील सर्व समाज ठामपणे कार्य करेल. समितीचे दुर्ग-भिलाई संयोजक अधिवक्ता आशीष शर्मा यांनी स्पष्ट केले की, दुर्ग-भिलाई येथून चालू झालेली ही समन्वयाची चळवळ संपूर्ण राज्यात विस्तारेल. हिंदूंवर होणार्‍या कोणत्याही आघाताविरुद्ध सर्व संघटना एकत्र येऊन घटनात्मक मार्गाने आंदोलन करतील.

बैठकीत गोरक्षणासाठी कार्य करणारे रायपूर येथील श्री. आशीष परिडा आणि दुर्ग येथील श्री. प्रदीप सिन्हा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदू जनजागृती समितीचे श्री. कमल विश्वास यांनी केले. बैठकीचा समारोप ‘जय श्रीराम’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी झाला.