वर्ष १९७१ मध्ये दोन तुकडे केले; आता किती होतील ?, हे सांगता येणार नाही ! – Rajnath Singh

राजनाथ सिंह यांनी पाकच्या संरक्षणमंत्र्यांना सुनावले !

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

बैरकपूर (बंगाल) – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या ‘पाकिस्तान कोलकात्यापर्यंत घुसेल’ या विधानाला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, वर्ष १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचे २ तुकडे केले होते, हे त्याने विसरू नये. आता जर पाकिस्तानने बंगालकडे वाकडी दृष्टी टाकली, तर त्याचे किती तुकडे होतील ?, हे सांगताही येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानने संयम बाळगावा आणि इतिहासातून धडा घ्यावा, अशी चेतावणी दिली. ते येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत बोलत होते.

तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी आसिफ यांच्या विधानावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली  होती. त्यावर राजनाथ सिंह म्हणाले की, देशाचा संरक्षणमंत्री म्हणून स्वतः भूमिका मांडत आहे. प्रत्येक वेळी पंतप्रधानांनीच बोलणे आवश्यक नसते. देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात सरकारची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे.