जग हे आता तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. एकीकडे इराण-अमेरिका-इस्रायल तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यात युद्ध चालू आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर निर्बंध वाढल्यामुळे गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या वितरणात अडचण येऊ शकते किंवा येत आहे, अशी परिस्थिती सर्वत्र आहे. याच पार्श्वभूमीवर एक बातमी वाचनात आली की, ९०० कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असूनही सरकारचलित शिर्डी संस्थानाने गॅसटंचाईचे कारण देत लाडूच्या प्रसादात कपात केली; तर केवळ १५० कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या गजानन महाराज मंदिराच्या शेगाव संस्थानाने सौरऊर्जेचा वापर करून प्रसाद सेवा अखंड सेवा चालू ठेवली. आपल्याला निसर्गाने दिलेल्या संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर करून भक्तांची उत्तम सोय कशी होईल ?, याचा विचार त्यांनी केला.
‘देव भावाचा भुकेला असतो’, पर्यायाने तो भक्ताचा भुकेला असतो. मिळालेल्या देणगीतून भक्तांसाठी काही करता येईल का ? याचा ध्यास असेल, तर प्रत्येक प्रसंगामध्ये भक्ताचा, त्याच्या सुखसोयीचा आणि त्याच्या श्रद्धेचा मान ठेवला जाईल. आपण प्रसादात कपात केली, तर येणार्या भक्तांना प्रसादरूपी लाडू मिळणार नाही, ही सोपी गोष्ट लक्षात कशी आली नाही ? कारण ‘प्रसाद’ या गोष्टीचे जे मूल्य भक्ताला असते, ते तो वाटणार्यांना कदाचित् नाही, असेच यावरून म्हणावे लागते.
इथे तुलना म्हणून नाही; परंतु शेगावच्या देवस्थानातील विनामूल्य अत्याधुनिक वाहनतळ, स्वच्छता, शिस्तबद्ध निवास व्यवस्था आणि पारदर्शकता भाविकांना थक्क करणारी आहे. याउलट शिर्डीत व्यापारीकरण आणि नियोजनाचा अभाव दिसून येणे, हे पुष्कळच खेदाचे आहे. देवस्थानाचे खरे वैभव सोने-चांदी, पैसा नसून भक्तांना मिळणारा सन्मान आणि समाधान यांत आहे, हे सत्य आहे. हा काही दोन्ही संस्थानांमधील भेद नसून भक्ताने अनुभवलेल्या प्रसंगाचा एक आलेख आहे. शेवटी संत-अवतारी पुरुषांच्या अस्तित्वाने पुण्य झालेली भूमी आपण कशी सांभाळतो ? यावरच सर्व अवलंबून आहे.
येणार्या कठीण काळात प्रत्येक संस्थानाने योग्य निर्णय घेणार्या, भक्तांसाठी निर्णय घेणार्या, अशा भक्त आणि भाविक यांचा समावेश असणारा न्यास करावा. सरकार आणि प्रशासन यांनी घेतलेली मंदिरे अन् मोठी संस्थाने जर परत एकदा भक्तांना दिली, तर नवीन निर्णय घेतले जातील, अशी आशा वाटते. शेगाव संस्थानाला कार्यकारी भक्त आणि त्यांनी घातलेले नियम यांमुळे एक आदर्श स्वरूप प्राप्त झाले आहे. आमच्या श्रद्धेच्या, पूजेच्या स्थानांना भक्त आणि संस्था या जोडीने जपूया, तरच भावी पिढीपर्यंत या देवालयांचे महत्त्व अधोरेखित होईल !
– श्री. आल्हाद माळगांवकर, पनवेल.


संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत