Maharashtra Madarsa Grant : महाराष्ट्र सरकारकडून ३०८ मदरशांना ५० लाख रुपयांचे अनुदान संमत !

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक १०३ मदरशांना लाभ

  • नागपूर आणि ठाणे जिल्ह्यांचाही समावेश

नागपूर – महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३०८ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान संमत केले आहे. ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’च्या अंतर्गत २१ जिल्ह्यांमधील या मदरशांवर ही खैरात करण्यात येणार असून या संदर्भातील शासनाचा निर्णय (अध्यादेश) घोषित करण्यात आला आहे. अल्पसंख्यांकांच्या सर्वांगीण विकासाचे नाव देऊन हा निधी वाटला जात आहे; पण या प्रकरणी हिंदु समाज संतप्त झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक मदरशांचे ‘आधुनिकीकरण’ !

सरकारने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक १०३ मदरशांना १६ लाख ७२ सहस्र रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याखालोखाल नागपूरमधील ५७ मदरशांना ९ लाख २५ सहस्र रुपये, तर ठाणे जिल्ह्यातील ३८ मदरशांना ६ लाख १६ सहस्र रुपये देण्यात येणार आहेत. यासह मुंबई शहरातील १२, मुंबई उपनगरातील १२, जळगावमधील ३, कोल्हापूर येथे ३, सोलापूर येथे ४, सातारा येथे ५, लातूरमध्ये ६, बीडमध्ये २०, जालन्यात १३, यवतमाळमध्ये ११, गडचिरोलीत ७ यांसारख्या २१ जिल्ह्यांतील मदरशांचा लाभार्थी सूचीत समावेश आहे.

धार्मिक शिक्षणासह आधुनिक विषयांच्या नावाखाली निधी !

या योजनेद्वारे मदरशांमध्ये केवळ धार्मिक शिक्षण न देता विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी आणि इंग्रजी हे विषय शिकवले जातील, तसेच उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे. ज्यामुळे मदरशांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून रोजगारांच्या संधीही उपलब्ध होतील, असा सरकारचा तर्क आहे. हा सर्व निधी संबंधित जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने मदरशांना वितरित करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतात अनेक ठिकाणी मदरशांमध्ये धर्मांधतेचे शिकवण दिले जाते आणि तेथे आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. असे असतांना मदरशांची चौकशी करण्याऐवजी त्यांच्यावर निधीची खैरात करण्याचा प्रकार जनतेला कसा रुचेल ?
  • निधर्मी देशातील सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थळांसाठी नव्हे, तर केवळ मदरशांना दिले जाणारे हे अनुदान म्हणजे केलेले लांगूलचालनच होय ! यासाठी हिंदूंचा कररूपी पैसा वापरला जातो, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही !
  • ज्या राज्यांत संस्कृत पाठशाळा आणि हिंदु धर्माच्या संवर्धनासाठी काम करणार्‍या संस्था यांना निधी देतांना हात आखडता घेतला जातो, तिथे मदरशांवर पैशांची उधळण करणे कितपत योग्य आहे ?