आमदार टी. राजा सिंह यांच्या ४ एप्रिल या दिवशी होणार्‍या बिलोली (नांदेड) येथील सभेला उच्च न्यायालयाकडून अनुमती !

पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली नाकारली होती सभेला अनुमती

टी. राजा सिंह

नांदेड – भाग्यनगर येथील ‘श्रीराम युवा सेने’चे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह यांच्या ४ एप्रिल या दिवशी बिलोली, नांदेड येथे सायंकाळी ६.३० वाजता होणार्‍या सभेला कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करून बिलोली पोलिसांनी अनुमती नाकारली होती. याला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात आव्हान देण्यात आले. येथे हिंदु विधीज्ञ परिषेदेचे अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी यांनी बाजू मांडत सरकारी पक्षाची सर्व सूत्रे युक्तीवादात खोडून काढली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे आणि आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपिठाने आमदार टी. राजा सिंह यांच्या बिलोली सभेला अनुमती दिली.

या संदर्भात सरकारी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेली सूत्रे

१. आमदार टी. राजा सिंह यांच्या पूर्वीच्या सभा या ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण भाषण) असून ते हिंदू-मुसलमान यांच्यातील दरी वाढवणार्‍या आहेत, तसेच त्यांच्यावर या संदर्भात गुन्हे नोंद आहेत.

२. श्रीरामनवमीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असून १३ ते २७ मार्च या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३७ (१) (३) अंतर्गत जमावबंदी लागू आहे.

पू. सुरेश कुलकर्णी यांनी केलेल्या युक्तीवादातील काही सूत्रे

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

१. काही हिंदूविरोधी संघटनांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तरीही यापूर्वीच्या चोपडा-जळगाव, छत्रपती संभाजीनगर, मिरा-भाईंदर-मुंबई, पुसद आणि यवतमाळ येथे झालेल्या सभांना उच्च न्यायालयाने अनुमती दिली होती, तसेच या सभांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

२. या संदर्भात उच्च न्यायालयाने (क्रिमिनल डब्लू.पी. – ३६९/२०२४, ८६६/२०२५, ५९४/२०२४ ) आदेश दिले आहेत. तसेच सर्वाेच्च न्यायालयानेही या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

३. याचिकाकर्ते आणि आमदार टी. राजा सिंह यांनी शांतता राखण्याचे शपथपत्र देण्याची सिद्धता दर्शवली आहे.

आमदार टी. राजा सिंह यांच्या उपस्थितीत निर्विघ्नपणे सभा होणारच !

या सभेचे आयोजन धर्म, संस्कृती आणि हिंदूएकतेचा संदेश यांसाठी करण्यात आले असून परिसरातील हिंदु बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे हिंदु बांधवांमध्ये उत्साह वाढला असून सभा निर्विघ्नपणे आणि भव्यतेने पार पडेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका

कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन नेहमी हिंदूंच्याच सभांना का आडकाठी आणली जाते ? हिंदूबहुल भारतात हिंदूंनी सभा घ्यायच्या नाहीत, तर कुठे पाकिस्तानात घ्यायच्या का ? केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार असतांना पोलीस प्रशासन अशा कृती जाणीवपूर्वक कुणाच्या सांगण्यावरून करते ? हेही पडताळणे आवश्यक आहे !