‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावरील परिसंवादात अनेक प्रतिष्ठित कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा गोव्यात पार पडलेला उपक्रम !

‘संगीतातून आध्यात्मिक उन्नती’ या परिसंवादाच्या वेळी डावीकडून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, शास्त्रीय गायक पंडित निषाद बाक्रे, ज्येष्ठ हार्माेनियमवादक पंडित विश्वनाथ कान्हेरे, मार्गदर्शन करतांना ज्येष्ठ बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे, नृत्यगुरु सोनिया परचुरे

फोंडा (गोवा) – २२ आणि २३ मार्च २०२६ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावर २ दिवस आध्यात्मिक परिसंवादाचे आयोजन रामनाथी, गोवा येथील संशोधन केंद्रामध्ये आयोजित करण्यात आले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी यापूर्वी सांगितलेला ‘कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून ती ईश्वरप्राप्तीचे प्रभावी माध्यम आहे’, हा मूलभूत विचार या परिसंवादाच्या केंद्रस्थानी होता.

दिपप्रज्वलनाने ‘संगीतातून आध्यात्मिक उन्नती’ या परिसंवादाचे उद्घाटन 

दिपप्रज्वलन करतांना डावीकडून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, ज्येष्ठ बासरी वादक पू. पं. केशव गिंडे, ज्येष्ठ हार्माेनियम वादक पं. विश्वनाथ कान्हेरे

परिसंवादाचा शुभारंभ शंखनादाने झाला. त्यानंतर ज्येष्ठ बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे, पंडित विश्वनाथ कान्हेरे आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या परिसंवादात पुणे, मुंबई, ठाणे आणि गोवा येथील अनेक तज्ञ अन् प्रथितयश कलाकार सहभागी झाले होते. ज्येष्ठ बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे, ज्येष्ठ संवादिनी (हार्मोनियम) वादक ‘सूरलयरत्न’ पंडित विश्वनाथ कान्हेरे, पंडित निषाद बाक्रे, प्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे, सौ. ज्योती शिधये, पंडित चंद्रशेखर वझे, सौ. पौर्णिमा आगटे, श्री. गौरीश तळवलकर, श्री. प्रदीप चिटणीस, सौ. सुमन दिवाकर, श्री. योगेश सोवनी आदी मान्यवरांची परिसंवादाला उपस्थिती लाभली. या चर्चासत्राच्या प्रथम दिवशी मान्यवर कलाकारांचे उद्बोधन सत्र ठेवण्यात आले होते. याचा गोव्यातील स्थानिक कलाकारांनीही लाभ घेतला.

‘संगीतातून आध्यात्मिक उन्नती’ या विषयाच्या चर्चासत्राच्यावेळी उपस्थीत समस्त कलाकार चर्चा करतांना

प्रथम दिवशीच्या सत्रामध्ये विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संगीतातून साधनेविषयी दिलेली दिशा’, याविषयी सविस्तर विवेचन केले. या विवेचनामध्ये भारतीय संगीतावर विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनकार्याची माहिती आणि संगीतातील सूक्ष्म अंगांचे विश्लेषण यांचा समावेश होता. यानंतर मान्यवर कलाकारांनी त्यांच्या विषयांची प्रस्तुती केली.

दुसर्‍या दिवशी (२३ मार्च या दिवशी) सर्व मान्यवर कलाकारांनी एकत्र येऊन ‘गायन, वादन आणि नृत्य या कलेला साधना कशी जोडावी ?’, तसेच यासाठीच्या प्रस्तावित असलेल्या विश्वविद्यालयाविषयी तात्त्विक आणि प्रायोगिक स्तरावर सखोल चर्चा केली. या चर्चेत सर्व कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘संगीत साधना’ कृतीशील होऊन कशी करता येईल ?’, याविषयी विविध अंगांनी विचारमंथन झाले, तसेच भावी पिढीतील कलाकारांना संशोधन केंद्रातील पवित्र वातावरणामध्ये आणून त्यांच्यासाठी शिबिरांचे आयोजन करणे, यामुळे ‘संगीत आणि अध्यात्म’ यांचा संगम साधण्यास साहाय्य होईल, या विचारावर सर्वांचे एकमत झाले.

परिसंवादाच्या समारोप प्रसंगी पू. पंडित केशव गिंडे यांनी स्वतः संशोधनातून विकसित केलेल्या ‘पांचजन्य वेणू’ या बासरीवर  सादर केलेल्या भजनाद्वारे झाला.

सहभागी मान्यवर कलाकारांचे अभिप्राय

‘संगीतातून आध्यात्मिक उन्नती’ या परिसंवादाला उद्बोधन करणारे आणि श्रोता म्हणून उपस्थीत समस्त कलाकार

१. पू. पंडित केशव गिंडे, ज्येष्ठ बासरीवादक, पुणे

सर्व कलाकारांनी येथे येऊन केलेल्या चर्चेतून परमानंद अनुभवता आला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘संगीतातून साधना’ ही दिलेली दिशा योग्यच आहे. ‘संगीतातून साधनेसाठी मार्गदर्शन करणारे प्रस्तावित विश्वविद्यालय हे लवकरात लवकर होवो’, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

२. पंडित विश्वनाथ कान्हेरे, ज्येष्ठ हार्मोनियमवादक, मुंबई

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयामुळे असे सगळे कलाकार अनेक वर्षांनी एकत्र आले. कलेची अंतिम पायरी ही ‘अध्यात्म’च आहे. येथील सात्त्विक वातावरणाचा लाभ माझ्या शिष्यांनाही मिळावा, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी त्यांना येथे निश्चित घेऊन येईन.

३. सोनिया परचुरे, प्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्यगुरु, मुंबई

संगीताला अध्यात्माची जोड दिल्यास त्याचा परिणाम संपूर्ण भारतावर होऊ शकतो. पुढील पिढीला कलेतून अध्यात्म शिकण्यासाठी ही भूमी अत्यंत सुपीक आहे.

४. पंडित निषाद बाक्रे, शास्त्रीय गायक, ठाणे

कलेला आध्यात्मिक दृष्टीकोन देणारी चळवळ येथून चालू होईल. सात्त्विक कलाकार निर्माण झाल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते.

५. पंडित चंद्रशेखर वझे, शास्त्रीय गायक, मुंबई

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय भविष्यात मार्गदर्शक विद्यापीठ ठरेल. आध्यात्मिक साधनेमुळे व्यक्तीसह कलेचीही उन्नती होते, हे येथे प्रकर्षाने जाणवले.

६. सौ. ज्योती शिधये, नृत्यांगना आणि नृत्यगुरु, ठाणे

या परिसंवादात केवळ चर्चा न होता आम्ही सर्वजण कृतीशील झालो. गुढीपाडव्याच्या पवित्र काळात झालेला हा उपक्रम, म्हणजे संगीत साधनेच्या व्यापक कार्याची ‘गुढी’ उभारल्यासारखे आहे.