छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण का केले जात आहे ? – टी. राजासिंह, आमदार

छत्रपती संभाजीनगर येथे भव्य हिंदु राष्ट्र जागृती सभा

डावीकडून सद्गुरु नंदकुमार जाधव, दीपप्रज्वलन करतांना टी. राजासिंह आणि कु. प्रियांका लोणे

छत्रपती संभाजीनगर, २० मार्च (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी जो प्राणत्याग केला आहे, तो कधीही विसरू शकत नाही. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या स्मृती जागृत होऊन धर्मकार्याची प्रेरणा मिळते. हिंदु एकजुटीचा आविष्कार म्हणून शहराचे नाव पालटून छत्रपती संभाजीनगर झाले. आजही येथील औरंगजेबाच्या कबरीसाठी ६ लाख ५० सहस्र रुपये शासकीय निधी देखरेखीसाठी व्यय केला जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना हा व्यय थांबवण्याची सुवर्णसंधी आहे. त्यांनी त्या दृष्टीने पावले उचलावीत,  असे परखड उद्गार आमदार टी. राजासिंह यांनी काढले. ते पिसादेवी परिसरातील ‘द्रौपदाबाई नानाभाऊ काळे क्रीडा संकुल मैदाना’वर गुढीपाडव्याला आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीच्या मराठवाडा समन्वयक कु. प्रियांका लोणे व्यासपिठावर उपस्थित होत्या.

सभेला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

सभेच्या प्रारंभी श्री. शरद पाटील यांनी शंखनाद केला. वेदमूर्ती श्री. अंबादासशास्त्री जोशीगुरुजी, श्री. अमोलशास्त्री जोशीगुरुजी या ब्रह्मवृंदांनी वेदमंत्रपठण केले. टी. राजासिंह  यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे यांनी सद्गुरु नंदकुमार जाधव, पिसादेवी गावातील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी श्री. टी. राजासिंह यांचा, तर सौ. वैजयंती मिसाळ यांनी कु. प्रियांका लोणे यांचा सत्कार केला. श्री. रामेश्वर भुकन यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा मांडला. शेवटी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सूत्रसंचालन कु. रागेश्री देशपांडे यांनी केले. सभेला ४ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन-मन-धन समर्पित करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

हिंदु राष्ट्र ही नवीन संकल्पना नाही, तर भारताचा मूळ स्वभाव आहे. कृष्णदेवरायांनी स्थापलेले विजयनगरचे साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य ही सर्व सनातन राष्ट्राची रूपे आहेत. रामराज्याची पहाट कुणीही रोखू शकत नाही. रामराज्याच्या स्थापनेत वानरसेनेने महत्त्वाची भूमिका निभावली, त्याप्रमाणे स्वत:च्या कौशल्यासह हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन-मन-धन समर्पित करणे, ही काळानुसार साधना आहे.

स्वसंरक्षण घेऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. प्रियांका लोणे

आठवड्यातून एक घंटा आपल्या भागातील मंदिरात जाऊन एकत्रितपणे हनुमान चालिसा पठण किंवा सामूहिक आरतीचे आयोजन करायला हवे. घराबाहेर पडतांना महिलांनी कुंकू आणि पुरुषांनी टिळा लावून बाहेर पडूया. सोयगाव तालुक्यातील एका ८० वर्षीय आजीवर धर्मांधाने अत्याचार केला. अशी अनेक उदाहरणे आज समाजात घडत आहेत. त्यामुळे सर्व महिलांनी शास्त्रासह, प्रशिक्षण घेऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध होण्याचा संकल्प करूया !

सभेनंतर कृतीशील होणार्‍या हिंदूंसाठी मारुति मंदिर, पिसादेवी येथे २२ मार्च या दिवशी आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.