Maharashtra Budget Session : विधानसभेत प्रभु श्रीरामाच्या नामाचा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला उपहास !

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणेसाठी धरला आग्रह !

भाजपच्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार देवयानी फरांदे आणि भास्कर जाधव

मुंबई – विधानसभेत १८ मार्च या दिवशी प्रश्‍नोत्तरात मनरेगाच्या विषयावर चर्चा चालू असतांना हिंदुत्वाच्या सूत्रावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांमध्ये तीव्र वाक्युद्ध रंगले. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कामगारांच्या प्रश्‍नावर बोलतांना ‘लोकांचे ‘जय श्रीराम’ करायचे ठरवले आहे का ?’, अशी उपरोधिक टिप्पणी केली. (जाधव यांना यातून सरकारची धोरणे कामगारांना मरणोन्मुख (राम नाम सत्य है) करत आहेत का ?, असे सांगायचे होते.) यावर भाजपच्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार देवयानी फरांदे यांनी तात्काळ आक्रमक पवित्रा घेत जाधव यांना ‘जय श्रीराम’ म्हणण्याचा आग्रह धरला.

प्रभु श्रीरामाच्या नामाचा अनादर करण्याचा प्रयत्न !

आमदार जाधव यांनी कामगारांच्या वेतनावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतांना प्रभु श्रीरामाच्या पवित्र नामाचा वापर नकारात्मक संदर्भात केला. ही गोष्ट लक्षात येताच आमदार फरांदे यांनी आपल्या जागेवरून उठून पहिल्या बाकावर येत जाधव यांना रोखले. ‘तुम्ही ‘जय श्रीराम’ म्हणा’, असा आग्रह त्यांनी धरला. प्रभु श्रीरामाचे नाव घेण्यास विरोध करणार्‍या आणि त्याचा उपहास करणार्‍या वृत्तीचा त्यांनी सभागृहात कडाडून निषेध केला.

आमदार फरांदे यांनी मांडलेल्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ भूमिकेमुळे भास्कर जाधव अडचणीत सापडले. जाधव यांनी फरांदे यांच्या विद्वत्तेवर टिप्पणी करत विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. या वेळी विधानसभा अध्यक्षांनी फरांदे यांना आपल्या जागेवर बसण्याचे निर्देश दिले; मात्र फरांदे यांनी त्यांचा आग्रह कायम ठेवत हिंदुत्वाचा अभिमान जपण्याचा प्रयत्न केला. या वेळी विरोधकांनी कामगारांच्या प्रश्‍नाचे भांडवल करत आणि घोषणा देत सभात्याग केला. कामगारांच्या कल्याणापेक्षा प्रभु श्रीरामाच्या नामाला विरोध करण्यातच विरोधकांनी अधिक धन्यता मानल्याचे या वेळी दिसून आले.

संपादकीय भूमिका

आमदार देवयानी फरांदे यांसारख्या आमदारच हिंदु धर्माची खरी शक्ती होत !