Afghanistan Pakistan Airstrike : आता चर्चा नाही, सूड घेणार ! – तालिबानची घोषणा

पाकिस्तानचे अफगाणिस्तानमधील रुग्णालयावर आक्रमण : ४०० जण ठार

काबुल (अफगाणिस्तान) – पाकिस्तानने १६ मार्चच्या मध्यरात्री काबुलमधील ‘ओमिद’ रुग्णालयासह अनेक भागांवर लढाऊ विमानांद्वारे बाँबफेक केली. यात ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे २५० जण गंभीररित्या घायाळ झाले आहेत. आक्रमणाच्या वेळी या रुग्णालयात अनुमाने २ सहस्र लोक उपस्थित होते. अनेक घायाळांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आक्रमणानंतर तालिबानने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आता चर्चेची वेळ संपली, आम्ही आता पाकिस्तानचा सूड घेऊ.

रुग्णालयावर आक्रमण केल्याचा आरोप पाकने फेटाळला !

अफगाणिस्तानच्या दाव्यानुसार दारुलअमान, अरजान किंमत, खैरखाना आणि काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू आले. तालिबानने या आक्रमणाचा तीव्र निषेध करत ‘हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे’, असे म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मोशर्रफ जैदी यांनी म्हटले की, काबुलमधील कोणत्याही रुग्णालयाला लक्ष्य करण्यात आले नाही. आक्रमण केवळ काबुल आणि नंगरहार प्रांतांतील सैन्यतळ, तांत्रिक उपकरणांचे साठे आणि शस्त्रसाठा केंद्र यांवर करण्यात आले. या कारवाईचा उद्देश केवळ सैनिकी संरचना नष्ट करणे हा होता, कोणतेही रुग्णालय किंवा नागरी संस्था लक्ष्य नव्हती. (जर अशा साठ्यांवर आक्रमण केले, तर इतक्या लोकांचा मृत्यू कसा झाला ? याचे उत्तर पाकने दिले पाहिजे ! पाक हा ‘जगातील सर्वाधिक खोटे बोलणारा देश’ असल्याने त्याच्याकडून सत्य बोलण्याची अपेक्षा करता येत नाही ! – संपादक)

पाकिस्तानचे खोटे उघड झाले ! – तालिबान नेते सुहेल शाहीन

सुहेल शाहीन

अफगाण तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांपैकी सुहेल शाहीन यांनी सांगितले की, काबुलमधील रुग्णालयावरील आक्रमणानंतर काहीही लपून राहिलेले नाही. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यावर बाँब टाकून त्यांची हत्या कशी करण्यात आली, हे आता संपूर्ण जगासमोर आले आहे. याविषयी तालिबानने वेगळे काही सांगण्याची आवश्यकता नाही; कारण विध्वंसाची दृश्येच सर्व काही सांगत आहेत.

अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे गंभीर उल्लंघन ! – भारताची पाकवर टीका

भारताने या आक्रमणावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, हे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे गंभीर उल्लंघन आहे आणि अशा कृती प्रदेशातील शांतता अन् स्थैर्य यांसाठी थेट धोका आहे. भारताने रमझानच्या पवित्र महिन्यात झालेल्या या आक्रमणाच्या वेळेविषयीही प्रश्न उपस्थित केले. तसेच ही घटना अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले. भारताच्या निवेदनात नमूद करण्यात आले की, कोणताही धर्म किंवा नैतिक मूल्ये रुग्णालय आणि तेथील रुग्ण यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे योग्य ठरवू शकत नाही.

भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले की, उत्तरदायी व्यक्तींना शिक्षा मिळावी आणि सामान्य नागरिकांवरील आक्रमणे तातडीने थांबवली जावीत. भारताने पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आणि अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व अन्  प्रादेशिक अखंडता यांच्याप्रती पाठिंबा व्यक्त केला.

अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू राशिद खान याने संयुक्त राष्ट्रांकडून चौकशीची केली मागणी

अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू राशिद खान याने पाकिस्तानी आक्रमणांचा तीव्र निषेध केला आहे. त्याने एक्सवर म्हटले की, काबुलमध्ये झालेल्या आक्रमणांमुळे लोक दुःखी आहेत. यात अनेक सामान्य नागरिकांचा जीव गेला. सामान्य नागरिकांच्या वस्त्यांवर आक्रमण करणे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्ध गुन्हा मानला जातो, तो जाणूनबुजून केला असो वा चुकून. विशेषतः रमझानच्या पवित्र महिन्यात अशा घटनेमुळे लोकांमध्ये अधिक दुःख आणि संताप आहे. संयुक्त राष्ट्रे आणि मानवाधिकार संघटना यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि जे कुणी उत्तरदायी असतील, त्यांना शिक्षा केली जावी.

संपादकीय भूमिका 

भारतावर अनेकदा पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमणे केली; मात्र भारताने कधी ‘सूड घेऊ’ असे म्हटले नाही, हे लक्षात घ्या !