Sonia Gandhi : (म्हणे) ‘खामेनी यांच्या मृत्यूवर केंद्र सरकारने मौन का बाळगले आहे ? देशाचे परराष्ट्र धोरण काय ?’ – सोनिया गांधी यांचे प्रश्‍न

नवी देहली – इस्रायल आणि अमेरिका यांच्या आक्रमणात इराणचे शिया मुसलमानांचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. यावरून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून ‘खामेनी यांच्या मृत्यूवर केंद्र सरकारने मौन का बाळगले आहे ?’, असा प्रश्‍न विचारला आहे.

सोनिया गांधी यांनी पत्रात लिहिले आहे की,

१. एखाद्या देशाच्या प्रमुखाची अशा पद्धतीने हत्या केली जाते, समकालीन आंतरराष्ट्रीय संबंधांवर ही एक खोलवर जखम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ ‘ही घटना म्हणजे चिंता व्यक्त करणारी गोष्ट आहे’, असे म्हटले आणि मर्यादित प्रतिक्रिया दिली; मात्र ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या, त्याविषयी त्यांनी मौन बाळगले आहे. इराण आणि भारत यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, ते पहाता हे मौन अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. (खामेनी यांनी इस्रायलच्या विरोधात जिहादी आतंकवादी संघटना हुती, हिजबुल्ला आणि हमास यांना सर्वप्रकारे साहाय्य केले. त्यामुळेच इस्रायलने त्यांना ठार मारले. तसेच हिजाब विरोधात आंदोलन करणार्‍या इराणी महिलांना खामेनी यांच्या आदेशाने ठार मारण्यात आले, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, यावर सोनिया गांधी कधी का बोलल्या नाहीत ? अशा खामेनी यांच्या हत्येवर भारताने का बोलावे ?- संपादक)

२. भारतासारख्या देशाने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन झाल्याविषयी कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. (आतंकवाद्यांना साहाय्यभूत होणारे असे कायदे चुलीत घालायला हवे, अशीच प्रतिक्रिया भारताने दिली पाहिजे, असेच आता जनतेला वाटते ! – संपादक) त्यामुळे जगात चुकीचा संदेश जातो. खामेनी यांना लक्ष्य करून त्यांचा माग काढून त्यांना ठार मारण्यात आले. त्यावर भारताने सूचक मौन धारण केले आहे, जे योग्य नाही. आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणावर आणि विश्‍वासार्हतेवर प्रश्‍न निर्माण करणारे हे मौन आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी भूमिका स्पष्ट करावी (मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी काँग्रेसने आयुष्य घालवले आणि घालवत आहे. यामुळेच देशातील जनतेने तिला सत्ताच्युत केले आहे. तरीही काँग्रेसच्या गांधी घराण्याला त्याची जाणीव झालेली नसल्याने अशा आतंकवाद समर्थक काँग्रेसला देशातून राजकीयदृष्ट्या संपवणेच आवश्यक झाले आहे ! – संपादक)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे ! – राहुल गांधी यांची मागणी

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या वाढत्या संघर्षात भारतीय लोकही अडकले आहेत अन् ते अनिश्‍चिततेचा सामना करत आहेत. भारताने यासंदर्भात योग्य ती भूमिका घेतली पाहिजे. १ कोटी भारतियांचा प्रश्‍न आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवी जीवन यांसंदर्भात भारताने ठोस भूमिका घेतली पाहिजे. पंतप्रधान मोदी यांंनी भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. (पंतप्रधान मोदी यांनी योग्यच भूमिका घेतली आहे, असेच जनतेला वाटते. – संपादक)

संपादकीय भूमिका

देशात धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या हत्या केल्या जातात, बांगलादेशात, पाकिस्तानात हिंदूंच्या हत्या केल्या जातात, तेव्हा सोनिया गांधी कधी पत्र लिहून त्या देशाच्या प्रमुखांना प्रश्‍न विचारत का नाहीत ?