JNU Violence : जेएनयूमध्ये युजीसीचे नियम लागू करण्याच्या मागणीवरून विद्यार्थ्यांकडून हिंसाचार

पोलिसांवर दगड-चप्पल फेकल्या, पोलिसांचा घेतला चावा 

(युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन – विद्यापीठ अनुदान आयोग)

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात, म्हणजे जेएनयूमध्ये २६ फेब्रुवारीच्या रात्री विद्यापीठ अनुदान आयोगाचे नवीन नियम लागू करण्यासाठी काढण्यात आलेल्या विद्यार्थी संघटनेच्या मोर्चाच्या वेळी काही विद्यार्थ्यांनी देहली पोलिसांवर दगडफेक केली, तसेच पोलिसांवर बूट फेकण्यात आले. इतकेच नव्हे, तर पोलिसांना चावण्यात आल्याची घटना घडली. यात अनेक पोलीस घायाळ झाले. यानंतर पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना कह्यात घेतले.

१. विद्यार्थ्यांचा हा मोर्चा शिक्षण मंत्रालयापर्यंत काढण्यात येणार होता; पण पोलिसांनी तो मध्येच थांबवला. पोलिसांनी सांगितले की, मोर्चा थांबवल्यानंतर काही आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांवर आक्रमण केले. जेव्हा आंदोलनकर्त्यांनी परिसरातून मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विद्यापिठाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची पोलिसांशी झटापट झाली. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा अदिती मिश्रा, माजी अध्यक्ष नितीश कुमार आणि इतर अनेकांना या वेळी कह्यात घेण्यात आले.

२. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, त्यांच्यावर पुष्कळ अधिक बळाचा वापर करण्यात आला. या झटापटीत अनेक विद्यार्थी घायाळ झाले आणि त्यांपैकी काहींना पोलिसांनी अज्ञात ठिकाणी नेले.

३. या हिंसाचारावर विद्यापिठाने म्हटले की, नियम लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या आदेशाचे उल्लंघन आहे, ज्याद्वारे नियमांना स्थगिती दिली होती. विद्यापिठाच्या कुलगुरु किंवा कुलसचिव यांना नियमांवर निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही.

संपादकीय भूमिका

  • युजीसीच्या नव्या नियमांवर सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती आणली असतांना ते लागू करण्याची मागणी करणारे न्यायालयाचा अवमानच करत आहेत. अशांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे !
  • प्रत्येक वेळी आंदोलनाच्या नावाखाली समाजविघातक कृत्ये करणार्‍यांना विद्यार्थी म्हणायचे कि समाजघातकी ? सरकार अशांची विद्यापिठातून हकालपट्टी का करत नाही ?