‘जमात-ए-इस्लामी सत्तेत आल्यास बांगलादेश ‘अफगाणिस्तान’ बनेल ! – Taslima Nasrin

तस्लिमा नसरीन

नवी देहली – बांगलादेशात १२ फेब्रुवारी या दिवशी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. याविषयी बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, बांगलादेशात ‘जमात-ए-इस्लामी’ पक्ष सत्तेत आल्यास बांगलादेशातील लोकशाही संपुष्टात येईल आणि कट्टरतावाद वाढेल. त्यामुळे अल्पसंख्यांकांवरील अत्याचार वाढतील आणि त्यांना देश सोडावा लागू शकतो. महिलांना बुरखा बंधनकारक केला जाईल. यामुळे बांगलादेश दुसरा अफगाणिस्तान होऊ शकतो.

नसरीन पुढे म्हणाल्या की,

१. वर्ष १९७१ च्या युद्धात जमात-ए-इस्लामीने पाकिस्तानी सैन्याला साथ दिली होती. या शक्ती भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थक आहेत; मात्र या वेळीही जमात निवडणूक जिंकणार नाही.

२. या निवडणुकीत जमातच्या कार्यकर्त्यांनी धर्माच्या नावावर प्रचार केला. ‘आमच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या तराजूला मत दिल्यास स्वर्गप्राप्ती होईल आणि आम्हाला मत देणे, हा अल्लाचा आदेश आहे’, असा दावा जमातच्या कार्यकर्त्यांकडून केला गेला.

३. ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बी.एन्.पी.) सत्तेत आल्यास त्याच्यासमोर मोठी आव्हाने असतील. कोणत्याही परिस्थितीत लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्याला श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी न्यून करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ‘बी.एन्.पी.’ने या सूत्रांवर प्रभावीपणे काम केल्यास जनतेचा विश्वास मिळू शकतो.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात कोणताही पक्ष सत्तेत आला, तरी तेथील हिंदूंवर अत्याचार हे होणारच आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी भारताने पावले उचलणे आवश्यक आहे !