Karnataka High Court : गुन्ह्यांचा आधार देऊन हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना भाषण करण्यापासून रोखता येणार नाही !

कर्नाटक उच्च न्यायालयाने पोलिसांना सुनावले  

कुमारी हरिका मंजुनाथ आणि चक्रवर्ती सुलीबेले

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या विरोधात पूर्वी नोंद असलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर पोलिसांना त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांत भाषण करण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला. बेळगाव येथे हिंदु संमेलन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात २ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना भाषण करण्यास पोलिसांनी मनाई केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन नामवंत राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची आठवण म्हणून करण्यात आले होते. या निर्णयानंतर पोलिसांनी संबंधित नेत्यांना भाषण करण्याची अनमुती दिली.

पोलीस नागरिकांना इच्छेनुसार बोलण्यापासून रोखू शकत नाहीत !

न्यायमूर्ती ललिता कन्नेगंटी यांनी नमूद केले की, पोलीस नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार सार्वजनिक सभेत बोलण्यापासून रोखू शकत नाहीत. ‘राज्य सरकार जेव्हा नागरिकांचे मूलभूत अधिकार मर्यादित करते, तेव्हा ती कारवाई कारणासहित आणि ठोस पुराव्यांच्या आधारेच असली पाहिजे’, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांना सुनावले.

काय आहे प्रकरण ?

२२ जानेवारी २०२६ या दिवशी दिलेल्या नोटिशीद्वारे पोलिसांनी आयोजकांची १३ जानेवारी २०२६ ची मागणी फेटाळली होती. या मागणीत कुमारी हरिका मंजुनाथ आणि चक्रवर्ती सुलीबेले यांना ‘सनातन धर्म’विषयक ३ दिवसांच्या संमेलनात भाषण करण्याची अनुमती मागण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, प्रस्तावित वक्त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद असून त्यांची उपस्थिती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकते. सुलीबेले यांच्या विरोधात ७, तर हरिका यांच्या विरोधात १ गुन्हा नोंद असल्याचे नमूद करण्यात आले.

याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता अरुण श्याम यांनी युक्तीवाद केला की, पोलिसांचा आदेश कर्नाटक पोलीस अधिनियम १९६३ मधील प्रावधानांच्या विरोधात आहे. हा अधिनियम पोलिसांना सार्वजनिक सभा नियंत्रित करण्याचा अधिकार देतो; मात्र मनमानी बंदी घालण्याचा नाही. ही कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना तसेच भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १९ आणि २१ अंतर्गत नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांना बाधक आहे. यापूर्वीही या दोन्ही वक्त्यांनी अशाच स्वरूपाच्या कार्यक्रमांत सहभाग घेतला असून सरकारने दाखवल्याप्रमाणे कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, याचिकाकर्त्यांनी दिलेले स्पष्टीकरण विचारात घेतले जाईल आणि त्यानुसार पुढील आदेश दिले जातील. सरकारचा संपूर्ण प्रयत्न कोणतीही अनुचित घटना घडू नये, हाच आहे. संबंधित वक्त्यांच्या सहभागामुळे पूर्वी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाल्याने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही न्यायालयास सांगण्यात आले.

संपादकीय भूमिका

कर्नाटकामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदुत्वनिष्ठांचा छळ केला जात आहे, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे काँग्रेस सरकारला चपराक बसली आहे !