रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर देवद (पनवेल) येथील १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर यांनी विविध माध्यमातून अनुभवलेली गुरुकृपा !

‘जानेवारी २०२५ मध्ये मी एका साधिकेच्या विवाहानिमित्त देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि साधकांच्या माध्यमातून मी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत. 

पू. शिवाजी वटकर

१. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून माझ्यात आंतरिक पालट केले आहेत’, असे वाटणे

मला अनपेक्षितपणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले आणि केवळ शांती अनुभवता आली. साधक आणि संत यांनी सत्संगाच्या वेळी मला विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे गुरुकृपेने कसलाही विचार न करता सहजतेने माझ्याकडून सांगितली गेली. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला २० टक्के स्थुलातून आणि ८० सूक्ष्मातून शिकवले अन् माझ्यात आंतरिक पालट केले’, असे मला वाटते.

(‘मलाही पू. वटकरकाकांमध्ये पालट जाणवले. ते वेगवेगळ्या जेवणाच्या पटलांवर काही साधकांशी मनमोकळेपणाने बोलतांना दिसले. पूर्वी मी त्यांना असे साधकांशी मनमोकळेपणाने बोलतांना कधी पाहिले नाही. त्यांच्यातील हा पालट लक्षणीय आणि आनंददायी होता.’ – सौ. छाया नाफडे)

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकाचे आत्मनिवेदन ‘एखादी प्रेमळ आई लहान मुलाचे बोल कौतुकाने ऐकते’, तसे ऐकणे आणि आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

गुरुकृपेने मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा सत्संग लाभला. त्यांच्या सेवेचा कक्ष म्हणजे भव्य-दिव्य मंदिर असून मी त्यांच्यामध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे चैतन्यमय रूप अनुभवले. मी त्यांच्याकडे माझ्या अनुभूती आणि साधनेतील अडचणी यांचे आत्मनिवेदन केले. त्या ‘साक्षात् देवी आहेत’, तरीही त्यांनी माझे आत्मनिवेदन ‘एखादी प्रेमळ आई जसे लहान मुलाचे बोल कौतुकाने ऐकते’, तसे ऐकले आणि आवश्यक तेथे मार्गदर्शन केले.

३. साधकांना भेटल्यावर जाणवलेली सूत्रे

३ अ. साधक हेच आत्मलग (मायेतील नातलग नव्हे) असल्याचे जाणवणे

१. सेवा करतांना आणि महाप्रसाद घेतांना मला साधकांचा आनंददायी अन् चैतन्यमय सत्संग लाभला. त्या वेळी मी काही साधकांच्या अंतरातील साधकत्व, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती अनुभवली.

२. मला साधकांची जिज्ञासू वृत्ती, शिकण्याची वृत्ती, नम्रता, प्रेमभाव, वाईट शक्तीविरुद्ध लढण्याची वृत्ती (क्षात्रतेज), सेवेची तळमळ, संघभावना, गुरूंप्रती भाव इत्यादी गुण आत्मसात् करता आले.

३. ‘साधक हेच माझे आत्मलग आहेत’, याची जाणीव होऊन मला आनंद झाला.

३ आ. साधकांमध्ये गुरुरूप अनुभवणे

१. मी साधकांशी बोलतांना मला समोर बसलेला साधक न दिसता एक लहानसे सुंदर गुरुरूप दिसत असे. ‘मी गुरुदेवांच्या प्राणप्रिय साधकांशी संवाद साधत आहे’, असे मला वाटत असे.

२. त्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करतांना मला कसलाही विचार करावा किंवा आठवावे लागत नसे. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकाला आवश्यक असलेले प्रायोगिक ज्ञान माझ्याकडून बोलून घ्यायचे. त्यामुळे साधकांना आणि मलाही त्यातून शिकायला मिळून आनंद होत असे.

गोवा येथे असतांना ‘आश्रमातील २ आठवड्यांचा काळ कधी संपला’, हे मला कळले नाही. साधकांनी मला सांभाळले, शिकवले आणि माझ्यावर प्रीतीचा वर्षाव केला. साधकांशी माझे आत्मीयतेचे नाते जोडले गेले. त्यांचे प्रेम आणि शिकवण यांची शिदोरी घेऊन मी देवद (पनवेल) येथील आश्रमात परतलो. साधकांचे प्रेम आणि भाव यांच्या स्मृतीचा मी आनंद घेत आहे.

सनातनच्या गोवा येथील आश्रमातील साधक, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो !’

– (पू.) श्री. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.२.२०२५)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • इथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक