स्वामी समर्थ यांनी भक्तांना दिलेल्या ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, या आशीर्वचनाचा अर्थ

आज असलेल्या गुरुप्रतिपदेच्या निमित्ताने…

स्वामी समर्थ

प्रश्न

एक भक्त : स्वामी समर्थ भक्तांना आशीर्वचन द्यायचे ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ याविषयी माझ्या मनात विचार येतो ‘स्वामींनी मी तुझ्या समवेत आहे किंवा तुझ्या पुढे आहे’, असे का म्हटले नाही ? ‘मी तुझ्या पाठीशी आहे’, असे का म्हटले ?’

उत्तर

श्री. राम होनप :

श्री. राम होनप

१. वरील विषयाची माहितीजालावर असलेली माहिती

‘स्वामी समर्थांच्या ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, या वचनाद्वारे स्वामी भक्तांना आश्वस्त करतात, ‘घाबरू नकोस, मी तुला साथ देईन किंवा मी तुझ्या साहाय्याला आहे.’

१ अ. स्वामींच्या आशीर्वचनाचे महत्त्व

१. हे वाक्य स्वामींच्या शिकवणीचा एक भाग आहे. ते भक्तांना धीर देतात आणि त्यांचे सांत्वन करतात.

२. जेव्हा कुणी व्यक्ती कठीण परिस्थितीत असते, तेव्हा हे वाक्य तिला शक्ती आणि नैतिक पाठिंबा देते.

३. अनेक भक्तांसाठी हे वाक्य एक आध्यात्मिक आधार आहे. यातून भक्तांना जीवनातील विविध अडचणींशी सामना करण्याची प्रेरणा मिळते.’

२. वरील विषयाच्या संदर्भात सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान !

२ अ. ‘स्वामींनी ‘मी तुझ्या पाठीशी आहे’, असे भक्तांना म्हणण्याची आध्यात्मिक कारणे

२ अ १. साधकाच्या पाठी असलेली कुंडलिनीशक्ती आज ना उद्या जागृत होण्याची निश्चिती देणे : ‘व्यक्तीच्या पाठीशी असलेल्या मूलाधारचक्रावर कुंडलिनीशक्तीचा वास असतो. ही शक्ती जागृत झाली की, साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीस प्रारंभ होतो. साधकाने कितीही साधना केली, तरीही ती जागृत करण्याचे सामर्थ्य गुरूंमध्येच असते. साधक साधना करत राहिला, तरी प्रारब्धामुळे येणार्‍या अडचणींमुळे त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होण्यास विलंब होतो. तेव्हा साधकाला निराशा येऊ शकते.

वरील प्रसंगाला अनुसरून स्वामी साधकांना आश्वस्त करतात, ‘काळजी करू नकोस. आज ना उद्या मी तुझी कुंडलिनी जागृत करणार आहे, म्हणजे मी तुझी आध्यात्मिक प्रगती करवून घेणारच आहे.’

२ अ २. कुंडलिनीशक्ती जागृत झाल्यावर साधकात निर्माण होणारे भय दूर करणे : काही साधकांमध्ये गुरुकृपा आणि साधना यांमुळे त्यांची कुंडलिनीशक्ती जागृत होते. तेव्हा त्यांना विविध दैवी अनुभव येऊ लागतात. हे दैवी जग नवीन असल्याने साधकाला प्रारंभी त्याची भीती वाटते. या प्रसंगाला अनुसरून स्वामी साधकाला आश्वस्त करतात, ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’

३. सारांश

साधकाचे आध्यात्मिक जीवन त्याच्या पाठीतील कुंडलिनीशक्तीवर आधारलेले असते. त्यामुळे स्वामी समर्थांनी त्यांच्या वचनात ‘मी पाठीशी आहे’, असा आवर्जून उल्लेख केला आहे.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक, वेळ आणि एकूण कालावधी : १६.९.२०२५, सकाळी ११.४१, ५ सेकंद)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक