पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !

आज सनातनच्या ५७ व्या संत पू. (श्रीमती) आनंदी पाटील यांच्या देहत्यागानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने...

सनातनच्या ५७ व्या संत पू. (श्रीमती) आनंदी पाटील (वय १०४ वर्षे) यांनी २५.५.२०२६ या दिवशी सायंकाळी ५.०९ वाजता त्यांची नात सौ. दीपा म्हात्रे यांच्या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील निवासस्थानी देहत्याग केला. त्यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटीलआजी

१. सौ. समीक्षा सुशीलकुमार राऊत

१ अ. श्री भवानीदेवीच्या दर्शनाला गेल्यावर झालेली भावस्थिती पू. आजींच्या अंत्यदर्शनाच्या वेळीही अनुभवणे : ‘पू. पाटीलआजी यांच्या देहत्यागाच्या एक दिवस आधी मी तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथे मंदिराच्या गाभार्‍यात गेल्यावर देवीचे दर्शन घेतांना भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वहात होत्या. पू. पाटीलआजींचे अंतिम दर्शन घेतांनाही मी तशाच प्रकारची भावस्थिती अनभुवली.

१ आ. पू. आजींचे पार्थिव जेथे ठेवले होते, तेथील वातावरण एखाद्या मंदिराप्रमाणे चैतन्यमय होते.

१ इ. एक क्षण मला पू. पाटीलआजींच्या डोक्यावर सूक्ष्मातून शेषनागाचा फणा दिसला. तो पाहून ‘ब्रह्मांडाचे दर्शन झाले’, असे मला जाणवले.

१ ई. ‘त्या ठिकाणी सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि अनेक संत उपस्थित आहेत’, असे मला जाणवत होते.’

२. श्री. राजेंद्र बा. दळवी आणि श्री. यशवंत चव्हाण

अ. ‘पू. आजींच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घालतांना आम्हाला ‘मंदिरात एखाद्या देवतेला प्रदक्षिणा घालत आहोत’, अशी अनुभूती आली.’

२६.११.२०१९ या दिवशी पू. आनंदी पाटील यांच्या पणतीच्या (सौ. ऋतिका मयुरेश म्हात्रे यांच्या) विवाहाच्या दिवशी काढलेले छायाचित्र
८ – १० दिवसांपासून अत्यल्प अन्न ग्रहण करूनही प्रसन्न आणि आनंदी असलेल्या पू. आनंदी पाटीलआजी !

पू. (श्रीमती) आनंदी पाटीलआजी यांनी एप्रिल २०२६ पासून अन्न ग्रहण करणे न्यून केले होते. त्या झोपूनच होत्या. मी आणि माझी मुलगी कु. आराध्या (आध्यात्मिक पातळी ५३ टक्के, वय १३ वर्षे), आम्ही दोघी १३.४.२०२६ या दिवशी पू. आजींना भेटायला गेलो. त्या वेळी माझ्या आईने पू. आजी गेल्या ८ – १० दिवसांपासून जेवत नसल्याविषयी मला सांगितले. काही चमचे भाताची पेज आणि पाणी, एवढेच त्या घेत असत. असे असूनही पू. आजी अत्यंत आनंदी आणि प्रसन्न होत्या.

त्या वेळी ‘८ – १० दिवस फारसे अन्न ग्रहण न करता कुणी इतके प्रसन्न आणि आनंदी कसे असू शकते ? ही केवळ गुरुदेवांची कृपा आहे’, असा विचार माझ्या मनात आला. कु. आराध्या हिने त्या वेळी नवीन चष्मा घेतला होता. तिने गंमत म्हणून तो चष्मा पू. आजींना (तिच्या पणजीला) घालायला दिला. पू. आजींनी स्वतः कधीच चष्मा घातला नव्हता; पण पणतीची इच्छा म्हणून तो चष्मा घालून त्या हसत होत्या. हे छायाचित्र मी सद्गुरु अनुराधा वाडेकर (वय ५३ वर्षे) यांना पाठवले. छायाचित्र पाहून त्याही म्हणाल्या, ‘‘पू. आजी किती आनंदी आहेत ! गुरुदेवच त्यांची काळजी घेतील. काळजी करू नये.’’

सौ. कपिला घाणेकर

३. देहत्यागानंतर पू. पाटीलआजींच्या हातांवर आलेली चैतन्यमय पिवळसर छटा !

पू. आजींनी देहत्याग केल्यानंतर काही घंट्यांनी मी माझ्या हातावर त्यांचा हात ठेवून छायाचित्र काढून घेतले. या छायाचित्रात पू. आजींच्या हातावर आलेली पिवळसर छटा स्पष्टपणे दिसत आहे.’

(वाचकांना विनंती : या संदर्भातील छायाचित्र sanatanprabhat.org या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहेत.)

– सौ. कपिला महेश घाणेकर (पू. (श्रीमती) आनंदी पाटील यांची नात), डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे. (१.६.२०२६)

३. सौ. प्रीती सुधाकर सागवेकर

अ. ‘मी पू. आजींच्या चरणांवर डोके ठेवल्यावर ‘माझ्या आज्ञाचक्रातून पांढरा प्रकाश आत जात आहे’, असे मला जाणवले. तो प्रकाश इतका होता की, मला पू. आजींचे पार्थिव दिसतच नव्हते.

आ. त्याच वेळी माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हे जप आतून चालू झाले अन् माझा भाव जागृत झाला.

इ. ‘पू. आजींकडून पुष्कळ शक्ती मिळाली’, असे मला जाणवले.’

४. सौ. सिंधु शिंदे

अ. ‘माझे शरीर पुष्कळ हलके झाले. त्या वेळी ‘माझे सर्व त्रास दूर झाले’, असे मला जाणवत होते.

आ. तिथे मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. वातावरणात जराही दाब जाणवत नव्हता. ‘तिथेच बसून रहावे. जाऊच नये’, असे मला वाटत होते.’


पू. (श्रीमती) आनंदी पाटीलआजी यांच्या देहत्यागापूर्वी गुरुकृपेने लाभलेला त्यांचा चैतन्यदायी सत्संग !


१.      ‘१९.५.२०२६ या दिवशी मी पू. (श्रीमती) आनंदी पाटीलआजी यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा मी पू. आजींना हाक मारल्यावर त्यांनी ‘ओ’ म्हणून प्रतिसाद दिला.

२. मी त्यांना ‘परम पूज्य आले आहेत का ?’, असे विचारल्यावर त्यांनी ‘हो’, असे उत्तर दिले.

३. त्यांनी माझे हात हातात घेतले. तेव्हा ‘पू. आजी मला आशीर्वाद देत आहेत’, असे मला वाटले.

४. मी तिथे असतांना पू. आजी थोड्या थोड्या वेळाने पाणी द्यायला सांगत होत्या. तेव्हा पू. आजींच्या सूनबाईंनी मला त्यांना पाणी पाजायला सांगितले. ही सेवा मिळाल्याने मला कृतज्ञता वाटली.

५. रुग्णाईत असूनही पू. आजी जराही कण्हत नव्हत्या. त्या स्वतःच एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर वळायच्या.

मी गावी असतांना २५.५.२०२६ या दिवशी पू. आजींनी देहत्याग केला. ही वार्ता कळल्यावर मला वाटले, ‘पू. आजींच्या देहत्यागापूर्वीच त्यांचे दर्शन घेण्याची बुद्धी प.पू. गुरुदेवांनी मला दिली.’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. पाटीलआजी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. रोहिणी कोरगावकर, डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे. (२.६.२०२६)

५. सौ. वंदना चौधरी, डोंबिवली

अ. ‘पू. आजींची त्वचा पिवळसर दिसत होती आणि ती चकाकत होती.’

६. श्रीमती संगीता बेनखळे

अ. ‘पू. आजींच्या अंत्यदर्शनानंतर माझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार नष्ट झाले.’

७. सौ. संध्या चौधरी, वर्तकनगर, ठाणे.

७ अ. चैतन्य मिळत असल्याचे जाणवणे : ‘पू. पाटीलआजींचे अंतिम दर्शन घेतांना मी त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. त्यानंतर १० मिनिटांनी ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले. मला सातत्याने ढेकरा आणि जांभया येत होत्या. माझ्या डोळ्यांतून पाणी येत होते. पू. आजींच्या चैतन्याचा लाभ झाल्याने मला आनंद जाणवत होता.’

८. सौ. दर्शना बागवे

अ. ‘पू. पाटीलआजींचे दर्शन घेतल्यावर मला आतून पुष्कळ शांतता जाणवली.

आ. मला पू. आजींच्या सभोवताली पिवळ्या रंगाचा तेजोमय प्रकाश जाणवला.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २.६.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक