‘वन्दे मातरम्’ हे गीत, त्याचे कवी बंकिमचंद्र चटर्जी आणि  देहलीतील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या’ ठिकाणी  ‘वन्दे मातरम्’ या गीताशी संबंधित लावलेले प्रदर्शन यांची विविध वैशिष्ट्ये !

‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने …

‘वर्ष २०२५ मध्ये बंकिमचंद्र चटर्जी रचित ‘वन्दे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली. या घटनेचे औचित्य साधून संपूर्ण भारतात मोठमोठे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे झाले आहेत. या निमित्त आपण या लहानशा लेखातून परम देशभक्त बंकिमचंद्र चटर्जी आणि त्यांनी लिहिलेले ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रगीत यांच्याविषयीची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे जाणून घेणार आहोत.


१. सूक्ष्म ज्ञानातून प्राप्त झालेली माहिती 

‘बंगाल येथील थोर राष्ट्रभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी) हे गतजन्मी सुप्रसिद्ध शिवकालीन महाकवी भूषण होते.’

२. संकेतस्थळावरून प्राप्त झालेली माहिती

२ अ. कवी भूषण यांचा परिचय : ‘महाकवी भूषण हे मूळचे उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सध्याच्या घाटमपूर तालुक्यात असलेल्या टिकवापूर गावातील एका ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते. ते कवी चिंतामणी आणि मतिराम यांचे बंधू होते. भूषण यांचे मूळ नाव अज्ञात आहे. ‘महाकवी भूषण’ ही पदवी त्यांना चित्रकूटच्या रुद्र प्रताप यांनी दिली होती. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मोगल सम्राट औरंगजेबला भेटण्यासाठी आगरा येथे गेले होते, तेव्हा त्यांची आणि भूषण यांची पहिली भेट झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाकवी भूषण यांना आश्रय दिला. नंतर वर्ष १६७० च्या काळात महाकवी भूषण वाराणसीहून मराठा राज्यात आले आणि छत्रपती शिवरायांच्या दरबारात उपस्थित राहिले.

२ आ. महाकवी भूषण यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम वर्णन करणार्‍या कवितेतील काही ओळी आणि त्यांचा अर्थ ! : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम हा इंद्राने असुरांवर मिळवलेल्या विलक्षण पराक्रमाप्रमाणे असल्यामुळे कवी भूषण यांनी ‘इन्द्र जिमि जम्भ पर….शेर शिवराज है ।’, असे वर्णिले आहे. ते एक महाकाव्य रचले गेले. या महाकाव्याच्या काही ओळी आणि त्यांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

२ आ १. पहिल्या परिच्छेदातील ओळी  

‘इन्द्र जिमि जम्भ पर,
बाड़व ज्यौं अंभ पर,
रावण सदंभ पर,
रघुकुल राज हैं’ ।। १ ।।

२ आ १ अ. वरील ओळींचा अर्थ : छत्रपती शिवाजी महाराज हे इंद्रासमान असुरांना पराभूत करणारे आहेत. भगवान विष्णूचा सातवा अवतार श्रीरामाने रावणाला असुर कुळासह नष्ट केले. – महाकवी भूषण (सौजन्य : संकेतस्थळ)

२ आ २. चौथ्या परिच्छेदातील ओळी 

‘तेज तम अंस पर,
कान्ह जिमि कंस पर,
त्यौं मलिच्छ बंस पर,
सेर सिवराज हैं ’ ।। ४ ।।

२ आ २ अ. वरील ओळींचा अर्थ : सूर्याचा एकच किरण काळ्याकुट्ट अंधाराला पळवून लावतो. बाळकृष्णाने त्याचा मामा कंस, चाणूर यांसारख्या दुष्टांना मुष्टीयुद्धात ठार मारले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज म्लेंच्छांना मुळासकट नष्ट करू शकतात. ‘सेर सिवराज हैं ।’, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वाघाप्रमाणे परमप्रतापी आहेत.’ – महाकवी भूषण (साैजन्य : संकेतस्थळ)

३. सूक्ष्म ज्ञानातून प्राप्त झालेली माहिती 

३ अ. महाकवी भूषण यांची व्यष्टी-समष्टी साधना झाल्याने त्यांना धर्मलोकात ‘धर्मकवी’ हे पद मिळणे : महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर रचलेले महाकाव्य ऐकून हिंदूंची धर्मचेतना जागृत झाली. त्यामुळे अनेक मावळ्यांना छत्रपती शिवरायांच्या सैन्यात भरती होऊन स्वधर्म आणि स्वराज्य यांच्या रक्षणासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. महाकवी भूषण यांची त्या जन्मात व्यष्टी-समष्टी साधना झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा लिंगदेह उच्च स्वर्गलोक आणि महर्लाेक यांच्यामध्ये असलेल्या ‘धर्मलोकात’ गेला. तेथे त्यांना ‘धर्मकवी’ हे पद मिळून त्यांचा गौरव झाला.

३ आ. महाकवी भूषण यांचा विविध जन्मांतील सूक्ष्म प्रवास 

३ इ. बंकिमचंद्र चटर्जी यांची साधना : त्यानंतर धर्मलोकात निवास करणारे महाकवी भूषण २६ जून १८३८ या दिवशी श्री. बंकिमचंद्र चटर्जींच्या रूपात अखंड भारतातील बंगाल राज्यात जन्माला आले. त्यांच्या मनात जन्मतःच देव आणि देश यांच्या प्रती भक्तीभाव होता. त्यांनी त्या जन्मात समष्टी कार्य करून समष्टी साधना केली. थोर राष्ट्रभक्त बंकिमचंद्र चटर्जी यांच्यामध्ये देवीच्या विविध स्वरूपांविषयीचा आदरभाव उपजतच होता. ते जेव्हा भारतदेशाचा विचार करायचे, तेव्हा त्यांना श्री दुर्गास्वरूपातील भारतमातेचे दर्शन होऊन त्यांचा भाव जागृत होत असे.

४. संकेतस्थळावरून प्राप्त झालेली माहिती

४ अ. बंकिमचंद्र चटर्जी यांची साहित्यसंपदा आणि त्यांनी लिहिलेले समस्त क्रांतीकारकांना प्रेरित करणारे ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रगीत ! : बंकिमचंद्र चटर्जी हे थोर कवी, कादंबरीकार, लेखक आणि पत्रकार होते. त्यांनी ‘दुर्गेशनंदिनी, कपालकुंडल, देवी चौधुराणी, आनंद मठ’ इत्यादी साहित्यिक लिखाण केले. भारतमातेला जुलमी इंग्रजांच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आणि समस्त क्रांतीकारकांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रगीत रचले. बंकिमचंद्र चटर्जी यांनी १८७० च्या दशकात संस्कृतप्रचुर बंगाली भाषेत ‘वन्दे मातरम्’ हे गीत लिहिले आणि ते सर्वप्रथम वर्ष १८८२ मध्ये चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या बंगाली कादंबरीत प्रसिद्ध झाले. या गीतातील २ ओळी आणि त्यांचा भावार्थ पुढीलप्रमाणे आहे. त्यावरून बंकिमचंद्र चटर्जी यांच्या विलक्षण प्रतिभेची आपल्याला प्रचीती येते.

४ आ. ‘वन्दे मारतम्’ या संस्कृतमिश्र बंगाली भाषेतील राष्ट्रीय गीतातील चौथ्या आणि पाचव्या परिच्छेदांतील ओळींचा अर्थ अन् त्यांचा भावार्थ 

४ आ १. चौथ्या परिच्छेदातील काव्यमय ओळी 

‘तुमि विद्या तुमि धर्म 
तुमि हृदि तुमि मर्म ।
त्वं हि प्राणाः शरीरे 
बाहुते तुमि मा शक्ति ।
हृदये तुमि मा भक्ति 
तोमारई प्रतिमा गडि मन्दिरे मन्दिरे ।। 
वन्दे मातरम् ।

अर्थ : तूच विद्या आणि धर्म आहेस. तूच हृदय आणि तत्त्व आहेस. तूच शरिरातील प्राण आहेस. आमच्या हातांमध्ये जी शक्ती आहे, ती तूच आहेस, तसेच हृदयात जी भक्ती आहे, तीही तूच आहेस. तुझीच प्रतिमा प्रत्येक मंदिरात पूजली जात आहे. अशा मातेला मी वंदन करतो.

४ आ १ अ. चौथ्या परिच्छेदातील काव्यमय ओळींचा भावार्थ : हे माते, तू ज्ञान आहेस. तू धर्म आहेस. तू हृदय आहेस. तू सार आहेस. तू आमच्या शरिरातील जीवनशक्ती आहेस. तू आमच्या बाहूंमधील शक्ती आहेस. तू आमच्या हृदयातील भक्ती आहेस. तुझी प्रतिमा प्रत्येक मंदिरात स्थापित आहे. हे माते, मी तुला भावपूर्ण वंदन करतो.’ (सौजन्य : संकेतस्थळ)

४ आ २. पाचव्या परिच्छेदातील काव्यमय ओळी 

‘त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी 
कमला कमलदलविहारिणी ।
वाणी विद्यादायिनी नमामि त्वाम् 
नमामि कमलाम् अमलाम् अतुलाम् ।।
सुजलां सुफलां मातरम् ।
वन्दे मातरम् ।।

अर्थ : तूच १० शस्त्रे धारण केलेली दुर्गादेवी आहेस. तूच कमळावर आसनस्थ झालेली देवी लक्ष्मी आहेस. तूच वाणी अन् विद्या प्रदान करणारी (देवी सरस्वती) आहेस. मी तुला वंदन करतो. लक्ष्मीदेवीला, अतिशय पवित्र, अतुलनीय, सुजल (जल देणार्‍या), सुफल (फळ देणार्‍या) मातेला मी प्रणाम करतो.

४ आ २ अ. पाचव्या परिच्छेदातील काव्यमय ओळींचा

भावार्थ : हे माते, तू १० शस्त्रांनी सज्ज असलेली दुर्गा आहेस. तू कमळावर बसलेली लक्ष्मी आहेस. तू वाणी आणि ज्ञान देणारी सरस्वती आहेस. मी तुला नमस्कार करतो. तू धन देणारी आहेस. तू परम पवित्र आहेस. तुझी तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. तू पाणी देणारी आहेस आणि तू फळ देणारी आहेस. हे माते, मी तुला भावपूर्ण नमस्कार करतो.’ (सौजन्य : संकेतस्थळ)

५. सूक्ष्म ज्ञानातून प्राप्त झालेली माहिती 

सुश्री (कु.) मधुरा भोसले

५ अ. ‘वन्दे मातरम्’ हे गीत गाणारे आणि ऐकणारे यांचा भारतमातेच्या सुंदर स्वरूपाप्रतीचा आदरभाव जागृत होणे : श्री दुर्गादेवीच्या कृपेने बंकिमचंद्र चटर्जी यांना ‘वन्दे मातरम्’च्या स्वरूपात भारतमातेचे सुंदर आणि सात्त्विक स्वरूप डोळ्यांसमोर आले अन् त्यांच्या मेधावी बुद्धीने श्री दुर्गादेवीस्वरूपिणी भारतमातेचे यथोचित वर्णन केले. त्यामुळे हे गीत वाचत असतांना किंवा ऐकतांना आपल्या डोळ्यांसमोर भारतमातेचे सुंदर स्वरूप येते आणि तिच्या प्रतीचा आदरभाव जागृत होऊन स्वतःचे दोन्ही कर आपोआप जोडले जातात.

५ आ. ‘वन्दे मातरम्’ गीताचे आध्यात्मिक महत्त्व ! : या संस्कृत गीतामध्ये श्री दुर्गादेवीची तारक-मारक शक्ती कार्यरत झाली आहे. त्यामुळे हे गीत ऐकत असतांना आपला श्री दुर्गास्वरूपिणी भारतमातेविषयीचा आदरभाव आपोआप जागृत होतो आणि तिच्या प्रती स्वतःच्या कर्तव्यांची जाणीव निर्माण होते. त्यामुळेच ‘वन्दे मातरम्’ हे गीत समस्त क्रांतीकारकांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरले. किंबहुना ‘वन्दे मातरम्’ हा मूलमंत्र आणि महामंत्र मादाम कामांसह सर्व क्रांतीकारकांना देशभक्तीने प्रेरित होण्यासाठी अतिशय प्रेरणादायी अन् देशाला स्वतंत्र करण्यासाठी अतिशय स्फूर्तीदायी ठरला.

५ इ. देहलीतील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या’ ठिकाणी लावलेल्या ‘वन्दे मातरम्’या गीताशी संबंधित लावलेल्या प्रदर्शनाची विविध वैशिष्ट्ये : १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या दिवशी भारत मंडपम्, नवी देहली येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या प्रदर्शनात ‘वन्दे मातरम्’ गीताचा इतिहास, त्याची निर्मिती आणि त्याचा झालेला प्रवास यांचे माहितीपर फलक लावण्यात आले होते. त्या चित्रांमधून श्री दुर्गादेवीचे धर्मतेज आणि त्यातील लिखाणातून धर्मज्ञान प्रगट होत होते. यातून सर्व भारतियांची राष्ट्रचेतना जागृत झाली. सर्व जण परस्परांतील भेदभाव विसरले आणि त्यांच्यात ‘आपण या भारतमातेचे सुपुत्र आणि सुपुत्री आहोत’, ही ऐक्याची भावना जागृत झाली.

५ ई. भारताचे राष्ट्रीय गीत अनंत काळपर्यंत समस्त देशभक्तांच्या हृदयात राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणार्‍या संजीवनीच्या स्वरूपात अमर रहाणार असणे : ८ एप्रिल १८९४ या दिवशी बंकीमचंद्र यांचे देहावसान झाले. ते जरी या जगातून गेले असले, तरीही त्यांनी रचलेले ‘वन्दे मातरम्’ हे भारताचे राष्ट्रीय गीत अनंत काळपर्यंत समस्त देशभक्तांच्या हृदयात राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणार्‍या संजीवनीच्या स्वरूपात अमर रहाणार आहे. अशा या थोर राष्ट्रभक्ताला आम्हा सर्व हिंदूंचे कोटीशः नमन !

६. भावपूर्ण कृतज्ञता !

‘हे भारतमाते, धन्य झालो आम्ही तुझ्या परमपवित्र रूपाच्या दर्शनाने ।
हे भारतमाते, कृतार्थ झालो आम्ही तुझ्या निरपेक्ष प्रेमाच्या वर्षावाने ।।’

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक २०.१२.२०२५, वेळ दुपारी ३ ते ३.३०; ज्ञानाचे टंकलेखन अन् संकलन करण्याचा दिनांक १३.१.२०२६ आणि एकूण कालावधी २ घंटे)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक