तमिळनाडूमधील द्रमुक सरकारने केरळ कुंभमेळा रथयात्रेस अनुमती नाकारली

चेन्नई (तमिळनाडू) – केरळमधील मलप्पूरम् येथे आयोजित केलेल्या कुंभमेळा – महामाघा महोत्सवाशी संबंधित रथयात्रेस तमिळनाडू सरकारने अनुमती देण्यास नकार दिला आहे. ही रथयात्रा उदुमलपेटजवळील थिरुमूर्थी टेकड्यांपासून प्रारंभ होणार होती. येथून भरतपुझा नदीचा उगम होतो.

१. आयोजकांनी सांगितले की, उदुमलपेटमधील पोलिसांनी रथयात्रा थांबवली आणि सांगितले की, चेन्नई येथील उच्च सरकारी अधिकार्‍यांनी अनुमती नाकारली आहे.

२. आयोजकांनी रथयात्रेतील श्री महामेरू मूर्तीला चारचाकी गाडीने केरळ सीमेपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आणि नंतर रथयात्रेला पलक्कड (केरळ) येथून पुढे पुन्हा प्रारंभ करण्यात आला. ही रथयात्रा भरतपुझा नदीकाठी थिरुनावयात चालू असलेल्या महोत्सवाशी जोडलेली आहे.

३. आयोजकांनी यापूर्वी म्हटले होते की, महामेरू प्रतिष्ठा देणारी ही रथयात्रा महोत्सवाचे एक महत्त्वाचा आध्यात्मिक टप्पा दर्शवेल. ही यात्रा भरतपुझा नदीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंध अन् तमिळनाडू आणि केरळ राज्यांमधील संस्कृतीचा ऐतिहासिक दुवा म्हणून महत्त्वाची आहे. यात तमिळनाडूमधील प्रमुख आधीनम् आणि धार्मिक संस्था यांचे सहभाग अपेक्षित होते.

४. ही रथयात्रा भारतीय धर्मप्रचारसभाचे आचार्य डॉ. श्रीनाथ करायट्ट यांच्या नेतृत्वाखाली आणि विविध साधू परंपरांच्या वरिष्ठ आचार्यांसह मार्गक्रमण होत आहे. यात्रा २१ जानेवारी या दिवशी थिरुनावयात संपणार आहे, जिथे महोत्सवाचा पुढील भाग म्हणून महामाघा पूजा होणार आहे.

५. ‘महामाघा महोत्सव २०२६’ चे अधिकृत उद्घाटन केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी १९ जानेवारीला केले आणि त्यांनी महोत्सवासाठी विधीपूर्वक ध्वजारोहण केले.

संपादकीय भूमिका

सनातन धर्माला नष्ट करण्याचे विधान करणार्‍या द्रमुक सरकारने अशी कृती केल्यास आश्चर्य वाटणार नाही. या वृत्तीला राजकीयदृष्ट्या नष्ट करण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत !