पोलंडने भारताविरोधातील आतंकवादाला प्रोत्साहन देऊ नये ! – Dr S Jaishankar

भारताने पोलंडच्या उपपंतप्रधानांना बैठकीत सुनावले !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस्. जयशंकर आणि पोलंडचे उपपंतप्रधान रादोस्लाव सिकोर्स्की

नवी देहली : आतंकवादाच्या विरोधात शून्य सहनशीलता (झिरो टॉलरन्स) ठेवावी. भारताच्या शेजारी कोणत्याही प्रकारच्या आतंकवादी संरचनेला प्रोत्साहन देऊ नये, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस्. जयशंकर यांनी पोलंडचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान असलेले रादोस्लाव सिकोर्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांना सुनावले. सिकोर्स्की यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. या वेळी पाकचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांच्यासमवेत प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनात काश्मीरचा उल्लेख करण्यात आला होता, ज्यावर भारताने आक्षेप घेतला होता.

डॉ. जयशंकर यांनी बैठकीत युक्रेन संकटावरून भारतावर होत असलेल्या निवडक आणि अयोग्य टीकेविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. पाश्चात्त्य देशांकडून रशियासमवेतच्या भारताच्या ऊर्जा संबंधांवरून भारतावर टीका केली जात आहे. रादोस्लाव सिकोर्स्की यांनीही युक्रेन सूत्रावरून भारतावर होत असलेली टीका अयोग्य आणि निवडक असल्याचे म्हटले आणि यावर डॉ. जयशंकर यांच्याशी सहमती दर्शवली.