(म्हणे) ‘काश्मीरमध्ये मशिदी आणि मदरसे यांची माहिती गोळा करून मुसलमानांना भयभीत करण्याचा भारताचा प्रयत्न !’ – Pakistan

पाकची भारतावर टीका

इस्लामाबाद (पाकिस्तान) : भारताकडून जम्मू-काश्मीरमध्ये मशिदी आणि मदरसे यांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येत आहे. यावर पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसारित करून ही कारवाई धार्मिक स्वातंत्र्याचा भंग असल्याचा आरोप केला. ‘धार्मिक गोष्टींमध्ये उघड हस्तक्षेप हा धर्म आणि श्रद्धा यांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे. जम्मू-काश्मीरमधील मुसलमानांना भयभीत करून कडेला ढकलण्याचा आणखी एक सक्तीचा प्रयत्न आहे’, असा आरोप पाकने केला आहे.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की,

धार्मिक अधिकार्‍यांची वैयक्तिक माहिती, छायाचित्रे आणि पंथीय संबद्धता गोळा करणे, हे योजनाबद्ध छळासमान आहे. यामागील उद्देश ‘धर्म मानणार्‍यांमध्ये भीती निर्माण करणे आणि त्यांच्या धर्माचे मुक्तपणे पालन करण्यास अडथळा निर्माण करणे’, हा आहे.

पाकिस्तान नेहमीच काश्मिरी  लोकांसमवेत एकजुटीने उभे राहील आणि त्यांना लक्ष्य करणार्‍या सर्व प्रकारच्या धार्मिक छळाविरोधात आवाज उठवत राहील.

संपादकीय भूमिका

  • ‘जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि येथे काय करायचे अन् काय नाही ?, हे सांगण्याचा पाकला कोणताही अधिकारी नाही’, असे भारताने ठणकावून सांगायला हवे !
  • भारत पाकप्रमाणेच त्याच्या देशातील हिंदूंच्या रक्षणाविषयीची सूत्रे का उपस्थित करत नाही ?