अभिनेते शाहरुख खान यांनी देशाची क्षमा मागावी ! – Imam Umer Ilyasi

  • अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर इलियासी यांची बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मागणी

  • शाहरुख खान यांच्या मालकीच्या क्रिकेट संघाकडून बांगलादेशाच्या खेळाडूची संघात निवड !

(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)

अभिनेते शाहरुख खान (डावीकडे) व त्यांनी निवड केलेला बांगलादेशचा खेळाडू (वर्तुळात), इमाम उमर इलियासी (उजवीकडे)

नवी देहली – बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या संदर्भात देशातील प्रसिद्ध व्यक्तींनी स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. शांत रहाणे, हे चुकीचा संदेश देणारे ठरते. अभिनेते शाहरुख खान यांनी देशवासियांची क्षमा मागावी आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी स्पष्ट विधान करावे. अशा संवेदनशील काळात मौन धरणे योग्य नाही, असे आवाहन अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांनी केले. ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल्) क्रिकेट स्पर्धेमधील कोलकाता नाईट रायडर्स या शाहरुख खान यांची मालकी असलेल्या संघाने एका बांगलादेशी खेळाडूची निवड केली, यावरून इलियासी यांनी वरील आवाहन केले.

इलियासी यांनी नमूद केले की, आजचा बांगलादेश भारताच्या मोठ्या योगदानामुळे निर्माण झाला आहे. अशा देशात अल्पसंख्यांक हिंदूंवर आक्रमणे होणे अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे. परिस्थिती इतकी गंभीर असतांना त्या देशातील लोकांना भारतात येऊन क्रीडा किंवा इतर उपक्रम करण्याची अनुमती द्यावी का ?

इस्लामच्या नावाखाली हिंसा करण्याला विरोध !

इस्लामच्या नावाखाली हिंसा करणे, हे इस्लामच्या शिकवणीच्या विरोधात आहे, असे इलियासी यांनी ठामपणे सांगितले. निरपराधांवर अत्याचार करणे किंवा त्यांचे प्राण घेणे, हे धर्म कुठल्याही प्रकारे मान्य करत नाही. हा विषय केवळ धर्म किंवा राजकारण यांच्याशी संबंधित नसून देश अन् मानवता यांच्याशीही संबंधित आहे. सर्व समाजघटक आणि प्रभावी व्यक्ती यांनी एकत्र येऊन हिंसेविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे. यामुळे जगभरात योग्य संदेश जाईल.