Bangladesh Blasphemy Cases : बांगलादेशात यावर्षी हिंदूंवर ईशनिंदेशी संबंधित ७१ गुन्हे !

सामाजिक माध्यमांतून अवमान केल्याचे आधी खोटे आरोप, नंतर हिंदूंवर आक्रमणे !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील अल्पसंख्यांकांसाठी कार्य करणार्‍या ‘ह्यूमन राइट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’ या संस्थेच्या अहवालानुसार जून ते डिसेंबर २०२५ या काळात बांगलादेशात हिंदु अल्पसंख्याकांविरुद्ध ईशनिंदा, म्हणजे धर्माचा अपमान करण्याच्या आरोपांशी संबंधित किमान ७१ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

अहवालात देण्यात आलेली माहिती

१. ‘आधी सामाजिक माध्यमांवरून अवमान केल्याचा आरोप, मग तात्काळ अटक, त्यानंतर जमाव जमणे आणि हिंदूंच्या वस्त्यांवर आक्रमण करणे’, ही धर्मांधांकडून आक्रमणासाठी प्रत्येक वेळी वापरली जाणारी पद्धत आहे. आता ईशनिंदेचे आरोप भीती पसरवण्याचे आणि अल्पसंख्यांकांना दाबण्याचे शस्त्र बनले आहेत.

२. या घटना देशातील ३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आहेत. रंगपूर, चांदपूर, चितगाव, दिनाजपूर, खुलना, कुमिल्ला, गाझीपूर, टांगाईल आणि सिलहट यांसारख्या अनेक भागांमध्ये असे गुन्हे समोर आले आहेत.

३. एकाच प्रकारच्या इतक्या मोठ्या संख्येने घटना घडणे हे दर्शवते की, या केवळ तुरळक घटना नाहीत, तर अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्याचा एक पद्धत बनत चालली आहे.

४. अनेक प्रकरणे सामाजिक माध्यमे, विशेषतः फेसबुकवरून चालू होतात. अनेकदा असे आरोप अशा पोस्टवर केले जातात, जे एकतर बनावट असतात किंवा खाते हॅक करून (नियंत्रण मिळवून) टाकलेले असतात. अनेकदा कोणत्याही ठोस चौकशीविना केवळ तोंडी आरोपांवरच गुन्हा नोंद होतो. तरीही पोलीस जमावाच्या दबावाखाली येऊन तात्काळ कारवाई करतात.

५. या प्रकरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक आरोपी हिंदू आहेत. अनेक पीडित अल्पवयीन आहेत, ज्यांचे वय १५ ते १७ वर्षे आहेत.

६. अनेक प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांवर सायबर सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. खुलना विद्यापीठ, नॉर्थ साऊथ विद्यापीठ आणि इतर शिक्षण संस्था यांमधील विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले, महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले किंवा पोलीस कोठडीत पाठवण्यात आले.

७. काही ठिकाणी पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतल्यानंतरही हिंसा थांबत नाही. जमाव हिंदूंच्या घरांवर आणि दुकानांवर आक्रमण करतो. यामुळे प्रशासन अल्पसंख्यांकांचे संरक्षण करू शकत आहे कि नाही ?, असा प्रश्न निर्माण होतो.

संपादकीय भूमिका

हिंदूंना ठार मारण्यासाठी किंवा त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी बांगलादेशातील धर्मांध मुसलमान खोटे आरोप करतात, तर भारतात धर्मांध मुसलमान हिंदूंची मंदिरे, धार्मिक मिरवणुका आदींवर आक्रमणे करूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही !