Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकच्या वायूदलाचा नूर खान तळ उद्ध्वस्त झाला ! – पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांची स्वीकृती  

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार (डावीकडे) ‘नूर खान’ या वायूदलाच्या तळाची हानी (उजवीकडे)

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘नूर खान’ या वायूदलाच्या तळाची मोठी हानी झाली, हे आता पाक सरकारने अधिकृतपणे मान्य केले आहे. ही स्वीकृती स्वतः पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यापूर्वी पाकिस्तानचा दावा होता की, ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांची मोठी हानी झाली नाही. इशाक डार म्हणाले की, भारताने ३६ घंट्यांच्या आत पाकिस्तानात १२ हून अधिक ड्रोन पाठवले आणि त्यांपैकी एका ड्रोनमुळे सैन्य ठिकाणाला फटका बसला. यात सैनिक घायाळ झाले.

१ नाही, तर ११ तळांवर भारताने केली आक्रमणे ! – लेफ्टनंट जनरल के.जे.एस्. ढिल्लों (निवृत्त) यांनी डार यांना फटकारले

लेफ्टनंट जनरल के.जे.एस्. ढिल्लों (निवृत्त)

इशाक डार यांच्या या स्वीकृतीवर भारताचे लेफ्टनंट जनरल के.जे.एस्. ढिल्लों (निवृत्त) यांनी इशाक डार यांच्या दाव्यांचा स्पष्ट विरोध केला आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान वारंवार चुकीचे दावे करतो आणि कधी कधी नकळत सत्य बाहेर पडते. पाकिस्तानचा दावा आहे की, भारताने ८० ड्रोन पाठवले आणि त्यांपैकी केवळ एकच ड्रोन नूर खान तळावर आदळला; पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी होती. पाकिस्तानमधील एका वृत्तसंस्थेने १४ ऑगस्ट २०२५ या दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या १३८  सैनिकांची सूची प्रसिद्ध केली होती. जर १३८ जणांना मरणोत्तर सन्मान देण्यात आला असेल, तर प्रत्यक्ष मृतांची संख्या ४०० ते ५०० असण्याची शक्यता आहे. त्यामुळे किरकोळ हानीचा दावा अजिबात पटणारा नाही. नूर खान तळावर आग लागल्याची दृश्ये पाकिस्तानातील नागरिकांनी स्वतः सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती. तसेच पाकिस्तानातील वायूदलाच्या ११ तळांना मोठा फटका बसला. भारतीय बाजूने उपग्रह छायाचित्रे आणि अन्य पुरावे सादर करण्यात आले आहेत.