Indians Deportation : यावर्षी ८१ देशांतून २४ सहस्र ६०० भारतीय नागरिकांना करण्यात आले हद्दपार

नवी देहली – वर्ष २०२५ मध्ये सौदी अरेबियातून ११ सहस्रांहून अधिक भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. जगभरातून ८१ देशांतून २४ सहस्र ६०० भारतीय नागरिकांना पुन्हा मायदेशी (भारतात) पाठवण्यात आले आहेत. त्या सर्वांत सौदी अरेबियातून परतलेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत सादर केली. व्हिसाचा (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र किंवा शिक्का) काळ संपल्यानंतरही तिथे थांबणे (ओव्हरस्टे), वैध कामकाज अनुमतीविना काम करणे, कामगार नियमांचे उल्लंघन करणे, पसार होणे आणि दिवाणी किंवा फौजदारी प्रकरणांमध्ये गुंतलेले असणे, यांमुळे काही जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

सौदी अरेबियाच्या खालोखाल अमेरिकेतून सर्वाधिक साधारण ३ सहस्र ८०० भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. यात बहुसंख्य खासगी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मागच्या ५ वर्षांच्या आकडेवारीची तुलना केली, तर वर्ष २०२५ मध्ये सर्वाधिक भारतियांना अमेरिकेतून हद्दपार केल्याचे दिसते. म्यानमार (१ सहस्र ५९१), संयुक्त अरब अमिरात (१ सहस्र ४६९), बहरीन (७३४), मलेशिया (१ सहस्र ४८५), थायलंड (४८१) आणि कंबोडिया येथून (३०५) जणांना परत भारतात पाठवण्यात आले.

दलालांकडून होणारी फसवणूक

तेलंगाणा सरकारच्या एन्.आर्.आय. (नॉन रेसिडेन्शियल इंडियन – अनिवासी भारतीय) सल्लागार समितीचे उपाध्यक्ष भीमा रेड्डी यांनी सांगितले की, बर्‍याच प्रकरणांमध्ये स्थलांतरित कामगार हे दलालांकडून होणार्‍या फसवणुकीला बळी पडलेले असतात. विदेशात गेल्यानंतर पोलिसांनी पकडताच त्यांना हद्दपार केले जाते.

संपादकीय भूमिका

भारताने यावर्षी इतक्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनाही बाहेर हाकलेले नाही, हे लक्षात घ्या !