देहलीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याविषयी सद्गुरूंकडून श्री कालभैरवदेवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त !

जयगड किल्ल्यावरील श्री कालभैरवदेवाला  प्रार्थना करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

जयपूर (राजस्थान) – सनातन संस्था आयोजित आणि ‘सेव्ह कल्चर, सेव्ह भारत फाऊंडेशन’ प्रस्तुत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आणि प्रदर्शन १३ ते १५ डिसेंबर या काळात भारत मंडपम्, देहली येथे निर्विघ्नपणे पार पडले. श्री कालभैरवदेवाच्या कृपेने हा महोत्सव पार पडला, याविषयी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी श्री कालभैरवदेवाचे दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.

राजस्थानमधील जयगड किल्ल्यावरील श्री कालभैरवदेव

सप्तर्षी जीवनाडीपट्टीत करण्यात आलेल्या उल्लेखाप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी २० डिसेंबर या दिवशी राजस्थानातील आमेर येथील जयगड किल्ल्यावरील श्री कालभैरवदेवाचे दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. श्री कालभैरवदेवाला फुलांचा आणि काजूचा हार अर्पण करून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सनातनचे साधक यांचे आरोग्य चांगले रहावे, आपत्काळात साधक, हिंदुत्वनिष्ठ आणि सज्जन यांचे रक्षण व्हावे’, अशी प्रार्थना श्री कालभैरवदेवाच्या चरणी करण्यात आली. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या श्री कालभैरवदेवाला प्रार्थना करत असतांना देवाला घातलेला हार एका बाजूने खाली पडला. ‘देवाने प्रार्थना ऐकल्याची प्रचीती मिळाली’, असे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले. यावेळी जयपूर येथील सनातनच्या ८३ व्या संत पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका याही उपस्थित होत्या.

 

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

देहलीतील प्रगती मैदानाजवळ असलेल्या पांडवकालीन किलकारी बाबा भैरवनाथ मंदिरात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी दर्शन घेतले आणि सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.