India Border Infiltration : गेल्या ११ वर्षांत बांगलादेश सीमेवरून ७ सहस्र ५२८ घुसखोर भारतात आले ! – केंद्र सरकारची आकडेवारी

चीनकडून घुसखोरी नाही !

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय

नवी देहली – बांगलादेश सीमेवरून वर्ष २०१४ पासून म्हणजे गेल्या ११ वर्षांत ७ सहस्र ५२८ घुसखोर भारतात घुसले, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी  लोकसभेत लेखी उत्तरात दिली. याच काळात पाकिस्तान सीमेवरून ४२५ लोक बेकायदेशीरपणे देशात घुसले आहेत; मात्र चीन सीमेवर घुसखोरीचे कोणतेही प्रकरण अद्याप नोंदवले गेलेले नाही, अशी माहितीही राय यांनी दिली.

राय यांनी सांगितले की, भारताने सुरक्षा भक्कम करण्यासाठी आणि घुसखोरी रोखण्याच्या उद्देशाने भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेच्या ९३ टक्क्यांपेक्षा अधिक भागावर कुंपण घालणे पूर्ण केले आहे. भारत-बांगलादेश सीमेच्या सुमारे ७९ टक्के भागात कुंपण लावण्यात आले आहे. भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेची एकूण लांबी ४ सहस्र ९६ किलोमीटर आहे. यापैकी ३ सहस्र २३९ किलोमीटरवर कुंपण घालण्यात आले आहे,  सुमारे ८५५ किलोमीटर सीमेवर अद्याप कुंपण घालणे शेष आहे. भारत-म्यानमार यांच्या १ सहस्र ६४३ किलोमीटर लांबीच्या सीमेपैकी आतापर्यंत केवळ ९ किलोमीटर भागावर प्रत्यक्ष कुंपण घालण्याचे काम पूर्ण झाले आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील बांगलादेशी घुसखोरांची संख्या पहाता या आकडेवारीवर जनता विश्वास ठेवणार का, हा प्रश्न आहे !