Sheikh Hasina : भारतात रहाणे, हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय ! – बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

बांगलादेशाने हसीना यांना बांगलादेशात परत पाठवण्याच्या केलेल्या मागणीविषयी भारताची भूमिका

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली : बांगलादेश सरकारने देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतातून ढाका येथे परत पाठवावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी म्हटले, ‘भारतात रहाणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि या निर्णयामागील पार्श्वभूमी बांगलादेशाची परिस्थिती आहे.’ शेख हसीना यांच्यावर गेल्या महिन्यात मानवतेविरुद्ध गुन्ह्या केल्याच्या आरोपासह मृत्यूदंड ठोठावण्यात आला आहे. भारताने अद्याप बांगलादेशाच्या या मागणीवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

१. हिंदुस्तान टाइम्स नेतृत्व संमेलनात परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांना शेख हसीना यांचा भारतात रहाण्याचा कलावधी विचारला असता त्यांनी सांगितले की, शेख हसीना विशिष्ट परिस्थितीत भारतात आल्या असून भारतात रहाण्याचा किंवा येथून जाण्याचा निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल. भारत हा बांगलादेशाचा हितचिंतक आहे.

२. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, भारताला बांगलादेशात स्थिरता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक अपेक्षित आहे. जर निवडणुकांशी संबंधित सूत्र असेल, तर सर्वप्रथम तेथे निष्पक्ष निवडणुका होणे आवश्यक आहे. बांगलादेशातील लोकशाही प्रक्रियेतून उदयास येणारे नेतृत्व भारताशी संबंधांविषयी संतुलित आणि प्रगल्भ दृष्टीकोन ठेवेल.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

भारताने सर्व प्रमुख देशांशी संबंध दृढ ठेवणे आवश्यक ! – परराष्ट्रमंत्री

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारतभेटीमुळे भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम होईल का ? या प्रश्नावर परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, ‘भारत अनेक स्तरांवरील संबंध ठेवतो आणि पर्यायांची निवड करण्याचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. सध्या अमेरिकेसमवेतचा व्यापार करार महत्त्वाचा आहे.’ पुतिन यांच्या भेटीमुळे अमेरिकेशी व्यापारवर होणार्‍या चर्चेत अडथळा येईल, हा अंदाजही त्यांनी फेटाळून लावला. भारतासारख्या उदयोन्मुख देशाने सर्व प्रमुख देशांशी संबंध दृढ ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.