Murshidabad Babri Masjid : आमदार हुमायूं कबीर यांनी केली बाबरी मशिदीची पायाभरणी

अनेक मुसलमानांनी डोक्यावरून आणल्या विटा !

आमदार हुमायूं कबीर (डावीकडे) डोक्यावरून विटा आणताना मुसलमान (उजवीकडे)

मुर्शिदाबाद (बंगाल) – येथील बेलडांगामध्ये आमदार हुमायू कबीर यांच्या उपस्थितीत ६ डिसेंबरला बाबरी मशिदीची पायाभरणी करण्यात आली. यासाठी सौदी अरेबियातून दोन धार्मिक विद्वान उपस्थित होते. यासह बंगाल आणि अन्य राज्यांतून आलेले सहस्रो मुसलमानही उपस्थित होते. अनेकांनांनी डोक्यावरून विटा आणल्या. कबीर यांनी गेल्या वर्षीच या संदर्भात घोषणा केली होती आणि त्यांनी प्रत्यक्षात त्याची पूर्तता केली, असे येथे म्हटले जात आहे. या वेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमासाठी १५० फूट लांब आणि ८० फूट रुंद असा मंच उभारण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च अनुमाने ६० ते ७० लाख रुपये झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बाबरच्या नावाने एकही वीट ठेवली गेली, तर ती भाजप उखडून टाकेल ! – उत्तरप्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची चेतावणी

हा सगळा तृणमूल काँग्रेसचा दिखावा आहे. बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. बाबरच्या नावाने एकही वीट ठेवली गेली, तर ती भाजप उखडून टाकेल.

हुमायू कबीर भाजपचा माणूस ! – काँग्रेस

उत्तरप्रदेशातील काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी आरोप केला की, हुमायू कबीर हा भाजपचाच माणूस आहे. त्यांनी वर्ष २०१९ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली होती. ते देशात वैमनस्य पसरवू पहात आहेत. मशीद ही उपासनेसाठी असते. जर तुम्ही (कबीर) इतके धर्मनिष्ठ असाल, तर वर्ष २०१९ मध्ये भाजपकडून निवडणूक का लढवलीत ? भाजपच्या भूमिकांची तुम्हाला तेव्हा जाण नव्हती का ?, असा प्रश्न मसूद यांनी विचारला.

हुमायूं कबीर यांचा काँग्रेस, भाजप आणि नंतर तृणमूल काँग्रेस असा राजकीय  प्रवास राहिला आहे. तृणमूलने नुकतेच त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.

बाबरच्या नावाने मशीद उभारणे, हे राजकीय उद्दिष्ट ! – इंडो-इस्लामिक सांस्कृतिक फाऊंडेशन

‘इंडो-इस्लामिक सांस्कृतिक फाऊंडेशन’चे सचिव अतहर हुसेन यांनी म्हटले की, मशीद योग्य जागेवर असेल आणि तिचा नकाशा संमत असेल, तर धार्मिक लोक तिथे बांधकाम करू शकतात; मात्र केवळ बाबरच्या नावावर मशीद उभारणे, हे राजकीय उद्दिष्ट आहे. अशाने श्रद्धेची खरी भावना अल्प होते. हुमायू कबीर मशीद उभारू इच्छित असतील, तर नावाच्या संदर्भात आग्रह धरू नये.

संपादकीय भूमिका

राजकीय स्वार्थासाठी बांधण्यात येणार्‍या या मशिदीच्या विरोधात तीव्र आंदोलन होऊन जीवितहानी झाली, तर त्याला हुमायू कबीरच उत्तरदायी असतील, हेच स्पष्ट होते !