पतीच्या आजारपणात साधिकेची झालेली विचारप्रक्रिया आणि तिला आलेल्या अनुभूती !

२१ नोव्हेंबर या दिवशी आपण मंगळुरू, कर्नाटक येथील गुरुप्रसाद गौडा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांना त्यांच्या आजारपणाच्या कालावधीत ‘सर्वकाही गुरूंच्या इच्छेने होत आहे’, याची आलेली प्रचीती हे लिखाण पाहिले. आज श्री. गुरुप्रसाद यांच्या पत्नी सौ. वैदेही यांची पतीच्या आजारपणात झालेली विचारप्रक्रिया आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/978910.html

श्री. गुरुप्रसाद गौडा आणि सौ. वैदेही गौडा

१. यजमानांची ‘अँजिओग्राफी’ करणार असल्याचे समजल्यावर काळजी वाटणे आणि त्यानंतर ‘गुरुदेव काळजी घेणारच आहेत’, या विचाराने मन स्थिर होणे

‘जेव्हा माझे पती श्री. गुरुप्रसाद यांनी ‘छातीत दुखण्याचा त्रास होत आहे आणि ‘अँजिओग्राफी’ (टीप) करण्यास सांगितली आहे’, असे मला सांगितले, तेव्हा एक क्षण माझ्या मनात काळजीचा विचार येऊन गेला; पण नंतर ‘श्री गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) समवेत असतांना कशाची काळजी करायची ? ते सर्व काळजी घेणारच आहेत’, असे विचार मनात येऊन माझे मन स्थिर झाले.

टीप – अँजिओग्राफी : रक्तवाहिन्यांची तपासणी करून त्यांतील अडथळे शोधण्यासाठी केली जाणारी वैद्यकीय चाचणी.

मी त्या वेळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होते. त्यानंतर मी त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या पुढील उपचारांच्या दृष्टीने मंगळुरू येथे गेले. त्या कालावधीत ते अल्प बोलायचे. त्यांना थकवा असल्यामुळे त्यांचा चेहराही उतरला होता. हे पाहिल्यावर माझे मन पुन्हा अस्थिर झाले; परंतु लगेचच माझ्या मनात पुढील विचार आले, ‘मनुष्यजन्म देऊन प्रत्येकाकडून किती सेवा करवून घ्यायची आहे ?’, हे श्री गुरूंनी ठरवले आहे. आम्हा सर्वांवर श्री गुरूंचे लक्ष आहे. यजमानांसाठी आणि माझ्यासाठी जे आवश्यक आहे, ते श्री गुरु करणार आहेत. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा ‘वर्तमान स्थितीत जे करणे आवश्यक आहे, ते करणे आणि आपले मन गुरुचरणी स्थिर करणे’, हीच आपली साधना असेल.’ त्यानंतर माझे मन पुन्हा स्थिर झाले.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

२. सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांनी दिलेला दृष्टीकोन !

त्याच दिवशी सद्गुरु बाबांशी (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी) माझे बोलणे झाले. त्यांनीही मला सांगितले, ‘‘ही सर्व देवाची लीला आहे. आपण केवळ अनुभवत रहायचे. जे योग्य आहे, ते गुरु करणारच आहेत.’’

३. त्यानंतर यजमानांचे पुढचे उपचार गोवा येथे करण्याचे निश्चित झाले. तेव्हा मला वाटले, ‘आता श्री गुरूंनी त्यांच्या कुशीतच बोलावले आहे, तर काय विचार करायचा ? तेच सर्व पाहून घेतील.’

पत्नीला साधनेत साहाय्य करणारे श्री. गुरुप्रसाद गौडा !

१. देवाप्रतीचा भाव

‘शारीरिक त्रास होत असतांना श्री. गुरुप्रसाद पुष्कळ स्थिर होते. ‘जे होईल, ती देवाची इच्छा !’, असा भाव ठेवून ते या प्रसंगाला स्थिरतेने सामोरे गेले.

२. साधनेत साहाय्य करणे

अ. ते मला कधीच भावनिक स्तरावर हाताळत नाहीत. प्रत्येक प्रसंगात ते ‘देव माझ्या साधनेसाठी योग्य कसे करत आहे ?’, हे माझ्या लक्षात आणून देतात.

आ. बर्‍याचदा मी त्यांच्याशी स्वतःच्या साधनेविषयी, तसेच स्वतःविषयी नकारात्मक बोलते. हा माझा स्वभावदोष आहे; पण त्या स्थितीत ते मला ‘साधनेच्या दृष्टीने कसा विचार करायचा ?’, हे सांगतात. माझ्याविषयी असे बरेच चढ-उतार चालू असतात; पण या सर्वांत ते नेहमी स्थिर राहून मला साहाय्य करतात.

‘श्री गुरूंच्या कृपेमुळे मला साधनेत साहाय्य करणारे पती मिळाले आहेत’, याबद्दल मी श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘मला त्यांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येऊ दे’, हीच श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. वैदेही गौडा (२८.८.२०२५)

४. आलेल्या अनुभूती

अ. गोवा येथे आल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाले. श्री गुरु, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु पिंगळेकाका आणि पू. रमानंदअण्णा यांच्या कृपेमुळे या सर्व प्रक्रियेत मला देवाची लीला अनुभवता आली.

आ. ‘जेव्हा साधकाच्या जीवनात गुरु येतात आणि गुरूंनी साधकाचा हात धरलेला असतो, तेव्हा त्याच्या जीवनात घडणार्‍या प्रत्येक प्रसंगात श्री गुरु योग्यच नियोजन करतात. त्याच्यासाठी जे आवश्यक आहे, ते गुरु घडवतात. गुरु प्रत्येक प्रसंग आणि परिस्थिती यांतून साधकाचे / शिष्याचे भलेच करतात’, हे मला अनुभवता आले.

इ. ‘काही वेळा परिस्थिती बाह्यतः प्रतिकूल वाटते, मनाचा संघर्ष होतो; पण त्यानंतर जे होते, ते शिष्याचा उद्धार करण्यासाठीच घडलेले असते’, याची अनुभूती या सर्व प्रसंगांत मला घेता आली.’

(समाप्त)

– सौ. वैदेही गौडा (श्री. गुरुप्रसाद गौडा यांची पत्नी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय २९ वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (२८.८.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक