(म्हणे) ‘लाल किल्ल्यासमोर उमटले काश्मीरमधील समस्यांचे पडसाद ! – Mehbooba Mufti

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचेही आतंकवाद्यांचे समर्थन करणारे विधान

मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – भाजप सरकारने जगाला सांगितले की, काश्मीरमध्ये सर्व काही ठीक आहे; पण काश्मीरमधील समस्या लाल किल्ल्यासमोर प्रतिध्वनीत होत आहेत. तुम्ही (सरकार) जम्मू-काश्मीर सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु ते वचन पूर्ण करण्याऐवजी तुमच्या धोरणांमुळे देहली असुरक्षित झाली आहे, अशी टीका करत काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जिहादी आतंकवाद्यांचे समर्थन केले. देहली बाँबस्फोटाच्या प्रकरणी त्या बोलत होत्या.

मेहबूबा पुढे म्हणाल्या की,

हिंदु-मुसलमान राजकारण केल्याने मते मिळू शकतात; पण देश कोणत्या दिशेने जात आहे ? देहलीतील लोकांना कदाचित् असे वाटते की, हिंदु-मुसलमान विभाजन जितके अधिक असेल तितका अधिक रक्तपात होईल, त्यांना अधिक मते मिळतील. मला वाटते की, त्यांनी पुन्हा विचार करावा. देश खुर्चीपेक्षा फार मोठा आहे.

काश्मिरी तरुणांनी स्फोट घडवू नयेत ! – मेहबूबा यांचे आवाहन

मेहबूबा मुफ्ती यांनी आवाहन केले की, स्फोट करणार्‍या तरुणांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की, तुम्ही जे करत आहात, ते सर्व चुकीचे आहे. हे केवळ तुमच्यासाठीच नाही, तर तुमच्या कुटुंबासाठी, जम्मू-काश्मीरसाठी आणि संपूर्ण देशासाठी धोकादायक आहे. तुम्ही मोठा धोका पत्करत आहात; कारण तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. अनेक निष्पाप लोकांचे जीवन धोक्यात आहे. (हे या तरुणांना ठाऊक आहे, तरी ते स्फोट घडवून आणत आहेत. याचाच अर्थ त्यांचा उद्देश त्याहून वेगळा आहे, हे उघड आहे. मेहबूबा यांनी कितीही आवाहन केले, तरी ते मनापासून नसून धूळफेक आहे, असेच लक्षात येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • जर अशा प्रकारे काश्मीरच्या कथित समस्या मांडल्या जात असतील, तर काश्मीरमधील हिंदूंनीही तशा मांडल्या, तर मेहबुबा मुफ्ती यांना चालणार आहे का ?
  • अब्दुल्ला परिवार आणि मेहबूबा मुफ्ती यांचे विचार सारखेच आहेत. म्हणजेच काश्मीरमधील नेते आणि तेथील धर्मांध मुसलमान अन् जिहादी एकाच विचारसरणीचे आहेत. त्यामुळेच तेथील आतंकवाद नष्ट होत नाही !