शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई !

शिर्डी – शिर्डी साईबाबा मंदिर परिसरातील पेढ्यांच्या दुकानांवर आणि काही प्रमुख उत्पादन कारखान्यांवर धाडी घालून २ लाख रुपयांचे ६०० ते ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त केले असून सर्व पेढे नष्ट करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे थेट तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने ही धडक कारवाई केली आहे. (अन्न व औषध प्रशासनाने केवळ तक्रार आल्यावरच धाडी न घालता, सर्वच तीर्थक्षेत्रांमधील अन्नपदार्थ आणि प्रसादाची नियमित, तसेच अचानक पडताळणी करणे आवश्यक आहे ! – संपादक)

अहिल्यानगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या साहाय्यक आयुक्त अपर्णा भोईटे यांनी सांगितले की, कह्यात घेतलेले पेढे निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होत असल्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा विचार करून शिर्डी नगरपालिकेच्या ‘डंपिंग ग्राऊंड’मध्ये नेत जेसीबीच्या साहाय्याने हा साठा नष्ट करण्यात आला आहे. पेढ्यांचे अधिकृत नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी आणि पडताळणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या पेढ्यांमध्ये आरोग्याला घातक ठरतील अशा पदार्थांची भेसळ सिद्ध झाली, तर संबंधित कारखानदारांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कडक कायदेशीर आणि फौजदारी गुन्हे नोंद केले जातील.

संपादकीय भूमिका

  • जनतेला धर्मशिक्षण न दिल्यामुळे शिर्डी येथेही निकृष्ट दर्जाचे पेढे विकण्याचे काम करत आहेत, हे दुर्दैवी ! अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
  • भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे खाऊन भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला उत्तरदायी कोण ?