श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी मुंबई येथे आयोजित यज्ञस्थळी समाजकंटकांचा दंगा !

  • ‘जय भीम’ अशी घोषणा देत पू. भिडेगुरुजी यांचे छायाचित्र असलेला फलक फाडला !

  • फलक फाडणार्‍यांवर पोलिसाकडून कोणतीही कारवाई नाही !

मुंबई, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त व्हावी, यासाठी वरळी येथील गांधी (जांभोरी) मैदानावर चालू असलेल्या श्री नारायण महायज्ञाच्या ठिकाणी काही समाजकंटकांनी दंगा केला. यज्ञाच्या निमित्ताने पटांगणाबाहेर लावलेल्या विविध फलकांमध्ये पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी या यज्ञासाठी दिलेल्या शुभेच्छेचाही फलक होता. त्यावर त्यांचे छायाचित्र होते. समाजकंटकांनी हा फलक फाडून टाकला. १५ नोव्हेंबरला सायंकाळी ७.३० ते रात्री ८ या वेळेत ‘जय भीम’, ‘मनोहर भिडे मुर्दाबाद’ अशा घोषणा देत मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ १५-२० समाजकंटकांनी हा प्रकार केला. या वेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली; मात्र फलक फाडणार्‍यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

यज्ञस्थळी लावलेला शुभेच्छाफलक

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त व्हावी, यासाठी ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’च्या वतीने १५ आणि १६ नोव्हेंबर या दिवशी हा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी गांधी मैदानाच्या बाहेर फलक लावले होते. समाजकंटकांनी मैदानाबाहेर दंगा केल्याचे समजताच यज्ञस्थळी उपस्थित हिंदूही मोठ्या संख्येने ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, अशा घोषणा देत मैदानाच्या प्रवेशद्वारावर आले. दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. साधारण २०-२५ मिनिटांनी परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकारानंतर रात्री ९.३० वाजता गांधी मैदानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पहारा होता. या घटनेविषयी ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’चे राष्ट्रीय महामंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे संयोजक श्री. पराग फडणीस यांच्याशी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबरच्या सायंकाळी माध्यमांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात येईल.’’

समाजकंटकांचा दंगा अनाठायी !

समाजकंटकांनी फाडलेल्या फलकावर पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या चित्रासह  ‘शुद्ध हेतूने आयोजित श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाच्या धर्मकार्यास माझ्या अखंड शुभेच्छा ! छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करूया’, असा शुभेच्छासंदेश होता. या संदेशामध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हते. केवळ पू. भिडेगुरुजी यांचे चित्र आणि संदेश आहे; म्हणून समाजकंटकांनी हा दंगा केल्याची चर्चा आहे.

संपादकीय भूमिका 

  • अशा जातीयवादी समाजकंटकांना मुंबई पोलिसांच्या कायद्याचा धाक का नाही ?
  • दंगा करणार्‍यांवर कारवाई न करणार्‍या पोलिसांना सरकारने जाब विचारणे आवश्यक आहे. समाजकंटकांवर कारवाई होत नसल्यानेच ते असे गुन्हे करू धजावतात !