मविआ आणि मनसे यांच्यावर विनाअनुमती मोर्चा काढल्याने गुन्हा नोंद

रॅली मध्ये सहभागी कार्यकर्ते

मुंबई – महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी १ नोव्हेंबर या दिवशी संयुक्त रॅली अन् ‘सत्याचा मोर्चा’ यांचे आयोजन केले होते. आयोजन करणार्‍या आयोजकांवर अनुमती न घेता मोर्चा काढल्याने मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मतदार सूचीतील घोटाळ्याच्या संदर्भात हा मोर्चा काढण्यात आला होता. ‘मतदार सूची अद्ययावत् करा, मतदार सूचींतील दोनदा आलेली नावे काढा, मतदार सूची अद्ययावत् होईपर्यंत निवडणुका लांबवा, ७ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा’, या मागण्या विरोधकांनी या वेळी केल्या.

निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे यांनी काढलेल्या ‘सत्याचा मोर्चा’च्या माध्यमातून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप केले होते. राज ठाकरे यांनी दुबार मतदारांचे पुरावे सादर करत निवडणुका एक वर्ष पुढे ढकलण्याची मागणी केली. या आरोपांना भाजपने ‘मूक आंदोलना’ने उत्तर दिले. भाजपने याला ‘फेक नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) म्हणत ‘जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी, ही विरोधकांची भूमिका आहे’, असा थेट आरोप केला, तसेच या आंदोलनाला ‘नौटंकी’ आणि ‘असत्याचा फॅशन शो’ म्हटले.