Jaishankar At UN : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा एक सदस्य आतंकवादी संघटनांचा हितचिंतक !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची चीनचे नाव न घेता टीका !

नवी देहली – संयुक्त राष्ट्रांसमोर असलेल्या आव्हानांना समजून घेण्यासाठी त्याचा आतंकवादावरील प्रतिसाद, हे एक मोठे उदाहरण आहे. सुरक्षा परिषदेतील एक कायम सदस्य उघडपणे त्या संघटनांचे समर्थन करतो, ज्या पहलगामसारख्या भयंकर आतंकवादी आक्रमणांचे दायित्व घेतात. यामुळे बहुपक्षीयतेच्या विश्वासार्हतेला गंभीर धक्का बसतो, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनचे नाव न घेता त्याच्यावर, तसेच संयुक्त राष्ट्रांवर टीका केली. संयुक्त राष्ट्रांच्या ८० व्या वर्धापनदिनी ते बोलत होते.

आतंकवाद्यांना आणि पीडितांना एकसमान मानणे निंदनीय !

‘जागतिक धोरणाच्या नावाखाली आतंकवाद्यांना आणि पीडितांना एकसमान मानणे, हे अधिक निंदनीय आहे. जेव्हा स्वतःला आतंकवादी म्हणून घोषित करणार्‍या लोकांना निर्बंधांच्या प्रक्रियेतून वाचवले जाते, तेव्हा त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या प्रामाणिकतेवरही प्रश्न निर्माण होतो’, असे जयशंकर यांनी म्हटले.

संयुक्त राष्ट्रांतील निर्णयप्रक्रियेवर टीका

परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले की, आपल्याला हे मान्य करावे लागेल की, संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्व काही व्यवस्थित नाही. त्याची निर्णयप्रक्रिया ना त्याच्या सदस्यांचे प्रतिनिधित्व करते, ना जागतिक प्राधान्यक्रमांना प्रतिसाद देते. त्यातील चर्चासत्रे अधिकाधिक ध्रुवीकृत झाली आहेत आणि त्याच्या कामकाजात अडथळे आले आहे. कोणत्याही अर्थपूर्ण सुधारणेला त्याच सुधारणा प्रक्रियेतच अडवले जाते. आता आर्थिक मर्यादा ही एक नवीन चिंता बनली आहे. संयुक्त राष्ट्रांचे पुनर्निर्माण करतांना ते टिकवून ठेवणे, ही आज आपल्या सर्वांसमोरील मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे.

संपादकीय भूमिका

अशा संयुक्त राष्ट्रांचा जगाला काहीच उपयोग नसल्याने त्याला टाळे ठोकणेच आता आवश्यक झाले आहे !