Missionaries Conversion Racket Chhattisgarh : भोळ्याभाबड्या हिंदु महिलांशी जवळीक साधून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचे उघड !

छत्तीसगडमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या पद्धतीत पालट !

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमधील अनेक शहरे आणि गावे यांमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी धर्मांतराची पद्धत पालटल्याचे दिसून आले आहे. आता ख्रिस्ती महिला प्रचारक त्यांची खरी ओळख लपवून हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. त्या महिला प्रचारक आजारी आणि अडचणीत असलेल्या, तसेच भोळ्याभाबड्या हिंदु महिलांशी आधी जवळीक साधतात, त्यांचा विश्वास संपादन करतात आणि नंतर त्यांना प्रार्थना सभेत नेऊन ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास प्रवृत्त करतात.

१. छत्तीसगडमधील कोरबा आणि जांजगीर जिल्ह्यांत प्रार्थना सभेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर हिंदु महिला अन् मुली यांना ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास प्रवृत्त केले जात आहे, असे चौकशीत समोर आले आहे. धर्मांतर केलेल्या महिला आणि मुली आता ‘नन’ बनत नाहीत, तर त्यांचे पूर्वीचे नाव आणि ओळख कायम ठेवून समाजात गुप्तपणे ख्रिस्ती पंथाचा प्रचार करत आहेत.

२. यासाठी ख्रिस्ती महिला प्रचारक गरीब हिंदु महिलांशी जवळीक साधतात. त्यांच्या समस्या ‘प्रार्थने’द्वारे सुटू शकतात, असा दावा करतात. त्यांना आमीष दाखवतात. त्यानंतर त्या महिलांना चर्चमध्ये नेऊन अर्ज भरून घेतले जातात. ‘प्रभुच्या (येशूच्या) आशीर्वादाने त्यांचे आजार आणि अडचणी नाहीशा होतील’, असे आश्वासन त्यांना दिले जाते.

३. आजारपण आणि अडचणी दूर होतील, या आशेने त्या पीडित महिला नियमित चर्चमध्ये जाऊ लागतात. तेथे औषधोपचार जरी आधुनिक पद्धतीने केले जात असले, तरी त्याचे श्रेय ‘प्रभूच्या कृपे’ला दिले जाते. यांपैकी अनुमाने ९० टक्के हिंदु महिला धर्मांतर करतात, तर १० टक्के महिला त्यांना काहीही लाभ न झाल्याने धर्मांतर करत नाहीत, असे अन्वेषणात दिसून आले आहे.

४. ३ ते १४ वर्षांच्या मुलींनाही शिक्षणाच्या नावाखाली चर्चच्या वसतीगृहांत ठेवले जाते. त्या ठिकाणी त्यांना शिक्षणासह ख्रिस्ती पंथाचे प्रशिक्षण दिले जाते.

५. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी या धर्मांतराच्या विरोधात कठोर पावले उचलण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, ‘प्रार्थना सभे’च्या नावाखाली  लोकांना भ्रमित करणार्‍या कार्यक्रमांवर निर्बंध आणणे आवश्यक आहे. या सभांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्या कायद्यात स्वतंत्र प्रावधान (तरतूद) केले जाईल. (धर्मांतरविरोधी कायद्यात केवळ प्रावधान करून न थांबता त्या कायद्याची कठोरपणे कार्यवाही करणारी प्रभावी यंत्रणा हवी ! – संपादक)

(म्हणे) ‘प्रार्थनेद्वारे मृत व्यक्तीलाही जिवंत करता येते !’ – पाद्रयाचा दावा !

कोरबा जिल्ह्यातील कोथारी गावातील पाद्री बाबूलाल मिरी यांनी दावा केला की, प्रार्थनेद्वारे मृत व्यक्तीलाही जिवंत करता येते.

संपादकीय भूमिका

  • भाजपचे राज्य असलेल्या छत्तीसगडमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या घटना अपेक्षित नाहीत ! धर्मांतर करणार्‍यांच्या मुसक्या आवळून त्यांना कारागृहात डांबले गेले पाहिजे !
  • धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदू ख्रिस्त्यांच्या विविध क्लृप्त्यांना बळी पडतात. त्यामुळे हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक !