Advocate Rakesh Kishore : भगवान विष्णूसाठी खजुराहो येथे उपोषण करणार !

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे अधिवक्ता डॉ. राकेश किशोर यांची घोषणा

नवी देहली – मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की, भगवान विष्णूने हे कार्य करण्यासाठी १०० कोटी हिंदूंमधून मला निवडले. मी ना वाकवणार, ना घाबरणार. भगवान विष्णूसाठी खजुराहो येथे उपोषण करणार आहे. त्याची संपूर्ण सिद्धता झाली असून मला त्यासाठी देवाचा आदेश मिळालेला आहे, असे विधान सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वरिष्ठ अधिवक्ता डॉ. राकेश किशोर यांनी केले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

माझ्यावर आक्रमण होऊ शकते !

माझ्या जिवाला धोका आहे. काही लोक नेहमीच ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्यास उत्सुक असतात. माझ्यावर आक्रमण होऊ शकते. मला सतत धमक्या मिळत आहेत. मी भीतीपोटी घराबाहेर जाणे, तसेच फिरायला जाणेही बंद केले आहे; पण मला भगवान विष्णूवर पूर्ण विश्वास आहे. भगवंताच्या आदेशानुसार मी खजुराहो येथे उपोषणासाठी जात आहे. भगवान विष्णूची मूर्ती पुन्हा स्थापण्यासाठी मी प्राण देण्यासही सिद्ध आहे. या जन्मात जमले नाही, तर पुढच्या जन्मात मी हे कार्य पूर्ण करीन.

न्यायालयाच्या टिपणीमुळे नुपूर शर्मा यांचे जीवन उद्ध्वस्त !

सर्वोच्च न्यायालयाच्या बोलण्यात आणि कृतीत फरक पडला आहे. नूपुर शर्मा यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्या भूमीगत आहेत. त्या आणि त्यांचे कुटुंब कुठे आहेत ?, कुणालाच ठाऊक नाही. अशी जीवनशैली कोण जगेल ? हे सर्व एका न्यायालयीन टिपणीमुळे घडले. न्यायालयाने नूपुर शर्मा यांना फटकारले; पण ‘सर तन से जुदा’ म्हणणार्‍यांवर कोणतीच कारवाई केली नाही. नूपुर शर्मा यांच्यासारखी स्त्री आज जिवंत असूनही प्रतिदिन मरत आहे. कन्हैयालाल यांची निर्घृण हत्या झाली, व्हिडिओही बनवण्यात आला;  पण मारेकरी आजही मोकाट फिरत आहेत.

‘सर तन से जुदा’ म्हणणार्‍यांविषयी न्यायाधीश शांत रहातात !

‘सनातन’ विषयाच्या संदर्भात जेव्हा काही येते, तेव्हा त्यावर न्यायाधीश टिप्पणी करतात; पण ‘सर तन से जुदा’ म्हणणार्‍यांविषयी शांत रहातात. धाडस असेल, तर ‘सर तन से जुदा’ म्हणणार्‍यांवरही टिपणी करा. आता हे चालणार नाही. आज सनातन धर्माची जी अवस्था आहे, ती आपल्या शांततेमुळे आहे. आपण अपमान सहन करत आलो; पण कधी कृती केली नाही. केवळ लेख लिहून थांबलो.

‘गजवा-ए-हिंद’ची सिद्धता चालू आहे !

ते (धर्मांध मुसलमान) लोक ‘गजवा-ए-हिंद’साठी (भारताचे इस्लामीकरण करण्यासाठीचे युद्ध) सिद्धता करत आहेत. भारताला इराणसारखे बनवायचे त्यांचे उद्दिष्ट आहे. मी स्वतः पश्चिम उत्तरप्रदेश आणि झारखंड येथे याची झलक पाहिली आहे. वर्ष १९४७ मध्ये इस्लामी देशांची संख्या १० ते १२ होती, आता ती ५७ झाली आहे. देशातील युवकांनी विचार करायला हवा की, जर उद्या परिस्थिती बिघडली, तर ते कुठे पळतील?

मला क्षमा केले, तरी सरन्यायाधिशांचे आभार मानणार नाही !

बूट फेकल्याच्या प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांना क्षमा केले, त्याविषयी राकेश किशोर म्हणाले, मी त्यांचे आभार मानणार नाही. त्यांनी मला क्षमा केले; कारण नोव्हेंबरमध्ये ते निवृत्त होत आहेत. त्यानंतर तेही माझ्यासारखे सामान्य अधिवक्ता होतील. न्यायालयात मी त्यांच्याशी प्रश्नोत्तर करतांना ते उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यांना ठाऊक आहे की, मी प्रामाणिक आहे आणि त्यांच्या कारभाराचे सत्य मी उघड करू शकतो. मला फसवण्याचे आणि अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत. कर्नाटकातही माझ्यावर खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे; पण मी घाबरणार नाही. मी अटकेला सिद्ध आहे.

काय आहे प्रकरण ?

खजुराहो (मध्यप्रदेश) येथील प्राचीन वामन मंदिरात भगवान श्री विष्णूची खंडित मूर्ती आहे.  हे मंदिर पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात आहे. ही मूर्ती काढून तेथे श्री विष्णूची नवीन मूर्ती स्थापन करण्यासाठी पुरातत्व विभागाला आदेश देण्यासाठी राकेश दलाल यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. ही याचिका सरन्यायाधिशांनी फेटाळून ‘नवीन मूर्तीसाठी देवालाच जाऊन सांगा’, अशा प्रकारचे विधान केले होते. त्यामुळे दुःखी झालेल्या अधिवक्ता राकेश किशोर यांनी सरन्यायाधिशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. आता ते या मूर्ती पालटण्याच्या मागणीसाठी तेथे उपोषण करणार आहेत.

हे वाचा → Advocate Rakesh Kishore : सरन्यायाधिशांवर बूट फेकण्यामागे त्यांचे श्री विष्णूच्या संदर्भातील विधान कारणीभूत !