Surajya Abhiyan Campaign : खासगी बसगाड्यांच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी केंद्रीय नियामक प्राधिकरणाची स्थापना करा !

सुराज्य अभियानाची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई – सणासुदीच्या काळात खासगी बससेवा पुरवणारे दलाल आणि ॲग्रिगेटर ॲप (ऑनलाइन तिकीट विक्रेते, उदा. रेडबस) यांच्याकडून प्रवाशांची होत असलेली लूट थांबवण्यासाठी सुराज्य अभियानाने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. यासंदर्भात अभियानाचे महाराष्ट्र समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ६ केंद्रीय मंत्र्यांना निवेदन दिले आहे.

ही लूट थांबवण्यासाठी केंद्रीय नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी सुराज्य अभियानाने निवेदनात केली आहे. या मागण्यांचे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन्, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत अन् माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनाही देण्यात आले आहे.

श्री. अभिषेक मुरुकटे

सुराज्य अभियानाद्वारे दिले गेलेले निवेदन –


सुराज्य अभियानाने निवेदनात म्हटले आहे की,

१. दिवाळी आणि इतर सण, निवडणुका, शाळांच्या सुट्ट्या अशा काळात खासगी बसचे दर ३ ते ५ पट वाढवले जातात. खासगी बसभाड्यावर कोणतेही सरकारी नियंत्रण नाही. रेडबससारख्या ॲप्स प्रवाशांकडून तिकिटाच्या नावाखाली भरमसाठ पैसे गोळा करतात; मात्र त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही कायदे नसल्यामुळे ही लूट चालूच रहाते.

२. केंद्र सरकारने राष्ट्रीय कायदा करून बसभाड्याची मर्यादा, ॲप ॲग्रिगेटरचे परवाने आणि त्यांचा कारभार यांवर देखरेख ठेवावी.

संपादकीय भूमिका

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी राष्ट्रप्रेमी संघटनेवर येऊ नये. सरकारने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !