कुरेशी कसायांचे गोरक्षकांच्या अपकीर्तीसाठी षड्यंत्र ! – महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज

बोलतांना महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज, बाजूला पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी

मुंबई – मागील काही दिवसांपासून पशूवधगृहात हत्येसाठी नेण्यात येणार्‍या गायींच्या रक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि गोरक्षक यांचा कुरेशी कसायांशी संघर्ष झाल्याच्या घटना घडत आहेत. गोरक्षक स्वत:च्या जिवावर उदार होऊन गायींचे रक्षण करत आहेत. गायींचे रक्षण होत असल्यामुळे कुरेशी कसायांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून गोरक्षकांची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र कुरेशी कसायांनी चालू केले आहे, असा गंभीर आरोप महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला.

१७ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात शेतकरी आणि समस्त गोरक्षक हिंदु समाज यांच्या वतीने महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज आणि पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका व्यक्त केली. विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. मोहन सालेकर हे उपस्थित होते.

राजकारणासाठी गोमातेचा उपयोग करू नका ! – पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी

काही लोक सुपारी घेतल्याप्रमाणे गोरक्षकांविषयी अपप्रचार करत आहेत. हे लोक शेतकर्‍यांच्या आडून गोरक्षकांना लक्ष्य करत आहेत. यामागे कुरेशी कसायांच्या संघटनेचा हात आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात १ सहस्र ८० गोशाळा आहेत. हे गोशाळा संचालक प्रसंगी पदरमोड करून गोवंशियांचा सांभाळ करत आहेत. गोमाता हा धार्मिक विषय आहे. राजकारण्यांनी गोमातेचा उपयोग राजकारणासाठी करू नये.