Monsoon Cross Himalayas : नैऋत्य मौसमी पाऊस (मॉन्सून) हिमालय ओलांडून तिबेटमध्ये पोचला : पृथ्वीच्या इतिहासात प्रथमच घडला असा चमत्कार !

मुंबई – पृथ्वीच्या इतिहासात प्रथमच नैऋत्य मौसमी पाऊस अर्थात् मॉन्सून हिमालय ओलांडून तिबेटमध्ये पोचला आहे. यामुळे जगात भयानक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या असामान्य घटनेने शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. मॉन्सूनचे ढग हिमालय पर्वतांवर आदळल्यानंतर भारताकडे परत फिरतात आणि भारतातील पर्वतीय आणि सपाट भागांत पाऊस पाडतो. हवामानशास्त्रज्ञांच्या मते जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता संपूर्ण हिमालयीन प्रदेशात स्पष्टपणे दिसून येत आहेत. येणार्‍या काळात ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते आणि त्याचे भयानक परिणाम दिसू शकतात.

१. ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी’च्या शास्त्रज्ञांच्या पथकाने लडाखच्या झंस्कर खोर्‍यात संशोधन करतांना काही आश्चर्यकारक गोष्टी शोधल्या आहेत. संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या मते मॉन्सूनची हिमालय ओलांडून तिबेटकडे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिबेट हा एक पठार प्रदेश आहे आणि जर या प्रदेशात मुसळधार पाऊस पडला, तर तो विनाश घडवून आणेल. पावसाळ्यात हिमालयाच्या अनेक भागांत बर्फवृष्टी चालू झाल्याचे पाहून शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

२. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सहस्रो वर्षांपासून हा क्रम चालू आहे की, मॉन्सूनचे ढग हिमालयावर आदळतात आणि भारतात मोठा जलसाठा निर्माण करतात. सध्याच्या वातावरणामुळे हिमालयीन प्रदेशात अतीवृष्टी होत असून त्यामुळे विद्ध्वंस होत आहे. संशोधनानुसार, हवामान उष्ण होत चालले आहे. त्यामुळे ढगही उंच होत आहेत. ढग हिमालयापासून २ सहस्र मीटर उंचीवरून पुढे सरकत आहेत. केदारनाथसारख्या भागात अधिक पाऊस पडण्याचे हेच कारण आहे.

३. या घटनेमुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्म-काश्मीर यांसारख्या राज्यांमध्ये भीषण पूर, ढगफुटी अन् भूस्खलन यांमुळे मोठी हानी झाली असून अनेकांचे प्राण गेले आहेत.