तिसरे महायुद्ध म्हणजे सायबर युद्ध असल्याने लोकांना सतर्क रहावे लागेल ! – विनोद खंदारे, लेफ्टनंट जनरल (निवृत्त)

छत्रपती संभाजीनगर – ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये कोण आपल्या बाजूने आणि कोण नाही ? हे स्पष्ट झाले. त्याचसमवेत आपले बलस्थान आणि अडचणी यांचा लेखाजोखा सिद्ध झाला आहे. तिसरे महायुद्ध लढाई स्वरूपात होईल असे नाही. सायबर आक्रमणे युद्धाचाच एक प्रकार आहे आणि तो कधीच चालू झाला आहे. त्यासाठी लोकांना सतर्क रहावे लागेल, असे आवाहन भारताचे संरक्षण मंत्रालय माजी सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे यांनी येथे केले. ‘ज्ञानयज्ञ फाऊंडेशन’च्या वतीने १८ ऑगस्ट या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर, भारताचे न्यू नॉर्मल’ या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली, त्या वेळी मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला.

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे म्हणाले की,

१. पाकिस्तानवर वेळ व्यय करायचा नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आल्यावर अनेक चर्चा झाल्या. विशेषतः युद्ध का थांबवले ? यावर टीकाटिप्पणी झाली; मात्र वर्ष २०४७ मध्ये नवीन मुलांच्या हातात विकसित देश देऊन जायचे आहे. पाकिस्तानसारख्या देशांसमवेत युद्धात व्यस्त रहायचे की, त्यांना अद्दल घडवून पुन्हा आपल्या कामाला लागायचे, हे आपल्याला ठरवावे लागेल.

२. जी चूक रशिया-युक्रेन देशातील युद्धात होत आहे, ती चूक आपल्याला करायची नाही. पाकिस्तानसारख्या राक्षसाला मारून दुसरा राक्षस जन्माला येणार नाही, तेसुद्धा पहावे लागेल.

३. ‘अणूबाँबने युद्ध कधी होईल, असे विचारले जाते. पाकिस्तानसारखा मूर्ख शेजारी देश असला, तर काहीही होऊ शकते. आपण सिद्ध रहायला हवे. आताच आपण ‘मॉकड्रिल’ (आपत्कालीन सराव) घेतले, त्या वेळी धक्कादायक प्रकार म्हणजे ‘आमच्याकडे सायरन नाही’, अशी उत्तरे मिळाली. आम्ही सीमेवरचे पाहू, तुम्ही अंतर्गत तर पहा.

४. आज चीनशी लढण्यासाठी आपल्याला तेवढे शक्तीमान व्हावे लागेल. नुसते सैन्य अद्ययावत् किंवा सक्षम असून होणार नाही. आर्थिक बाजूनेही तेवढेच भक्कम व्हावे लागणार आहे.

५. आपल्या शाळांमध्येही आठवड्यातून एक दिवस आपत्कालीन प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. देशातील शिक्षक, वैज्ञानिक हे आपली संपत्ती असून तिचे संरक्षण झाले पाहिजे.

संपादकीय  भूमिका 

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे म्हणाले की, भारताने पाकिस्तानला धडा शिकवल्यावर आपण जे ब्राह्मोससारखे क्षेपणास्त्र वापरले, त्यांची मागणी इतर देशांकडून केली जाते; मात्र आपल्याशी प्रामाणिक कोण आणि अप्रामाणिक कोण ? हे पाहून निर्णय घ्यावा लागेल. आगामी काळात आपलेच क्षेपणास्त्र आपल्यावर उलटणार नाही, अशी काळजी घ्यावी लागेल !