‘शाळेत केलेला अभ्यास लक्षात रहात नाही; पण काही क्षणांसाठी झालेला अपमान आयुष्यभर लक्षात रहातो’, याचे कारण !

फोंडा (गोवा) येथील सनातनचे १०१ वे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले (पू. भाऊकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांचा आज श्रावण कृष्ण एकादशी (१९.०८.२०२५) या दिवशी ९० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त पू. अनंत आठवले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये ५.१०.२०२४ या दिवशी ‘शाळेत केलेला अभ्यास लक्षात रहात नाही; पण काही क्षणांसाठी झालेला अपमान आयुष्यभर लक्षात रहातो’, याविषयी झालेले संभाषण येथे दिले आहे.

पू. अनंत आठवले यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. अनंत आठवले
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पू. अनंत आठवले : मला मनातल्या स्मरणाविषयी एक प्रश्न विचारायचा आहे. आपण लहानपणी शाळेत असतांना ‘बे एके बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा’, असे पाढे पाठ करायचो. पुनःपुन्हा घोकंपट्टी करायचो, तेव्हा ते लक्षात रहायचे. आपण शाळेत अभ्यास करतो, महाविद्यालयात (कॉलेजात) अभ्यास करतो. पुढच्या कॉलेजात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अभ्यास करतो. ते सगळे आपल्याला लक्षात रहाण्यासाठी पुनःपुन्हा वाचावे लागते; पण तरुणपणी आपला कुणी अपमान केला असला, तर तो आजीवन लक्षात राहतो. एकदाच एका क्षणात आपला अपमान होतो; पण आपल्या कायमचा स्मरणात राहातो. असे का ? जे हवे आहे, ते लक्षात ठेवायला पुष्कळ मेहनत करावी लागते. जे नको आहे, ते लक्षात रहाते. हे असे का ? मला खरोखरंच उत्तर माहित नाही. तुम्हाला माहित नाही, असे उत्तर देऊ नका.

पू. भाऊकाका यांचा परिचय

पू. अनंत बाळाजी आठवले (उपाख्य पू. भाऊकाका) हे स्थापत्य अभियंता [बी.ई. (सिव्हिल)] असून त्यांनी ‘मध्यप्रदेश लघु उद्योग निगम’ या शासकीय संस्थेत ३१ वर्षे सेवा केली. वर्ष १९९३ मध्ये ते सेवा निवृत्त होण्यापूर्वी ‘प्रभारी मुख्य महाप्रबंधक’ या पदावर होते. महाविद्यालयात शिकत असतांना ‘अभियंता होणे’, हे केवळ उपजीविकेचे साधन आहे आणि ‘ब्रह्मज्ञान मिळवणे’, हे जीवनाचे ध्येय आहे’, असा त्यांचा दृष्टीकोन होता. यामुळेच ते वेळ मिळेल तेव्हा तत्त्वज्ञानावरील विविध ग्रंथ वाचत. त्यांनी ‘योगवासिष्ठ’सारखे संस्कृत भाषेतील काही ग्रंथ मूळ स्वरूपातच अभ्यासले आणि अजूनही अध्ययनरत आहेत. पू. भाऊकाका यांनी ‘गीताज्ञानदर्शन’ हा अप्रतिम ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात ‘गीतेतील प्रत्येक अध्यायातील तत्त्वज्ञान, आत्मज्ञानप्राप्तीचे विविध मार्ग, त्यासाठी आवश्यक असणारे गुण, भक्तीचे प्रकार, कर्मफलन्याय’, अशा सर्व अंगांचे साधनेच्या दृष्टीने सोप्या भाषेत विवेचन केले आहे.

त्यामुळे साधकाला गीता समजून घेणे आणि गीतेतील खरे मर्म समजणे सोपे झाले आहे. पू. भाऊकाका वर्ष २००९ पासून सनातनच्या संकेतस्थळासाठी मराठी भाषेतील लेखांचा हिंदी भाषेत अनुवाद करत आहेत. ते आज वयाच्या ९० व्या वर्षीही विविध शब्दकोश आणि संदर्भग्रंथ यांचा अभ्यास करून भाषांतर परिपूर्ण करत आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. अपमान झालेला तेवढा लक्षात रहातो. असे मनुष्याच्या जीवनामध्ये का होते ?

पू. अनंत आठवले : अभ्यास केलेला लक्षात रहात नाही. काही क्षणांसाठी झालेला अपमान आयुष्यभर लक्षात रहातो. पाढे सतत २ – ३ वर्षे सलग पाठ केले, तरी काही वर्षांनंतर विसरायला होतात. असे का होते ?

मी ४० – ५० वर्षे  गीता वाचली असेल. आता अलीकडे २ – ३ मास मला वेळ मिळाला नाही. आता वार्धक्यामुळे ती स्मरणातून कमी व्हायला लागली. मला श्लोक आठवतात; पण ते पटकन आठवत नाहीत. पूर्वी ज्या क्षणी जो श्लोक पाहिजे असेल, तो मला नेहमी आठवत असे. मला गीतेत रस नाही, इंटरेस्ट (आवड) नाही, असे नाही किंवा माझा विषय संपला, असेही नाही. गीता हेच माझे आध्यात्मिक जीवन आहे, तरीसुद्धा मी विसरतो. ते का ? आणि नको असलेल्या गोष्टी लक्षात का राहतात ? ते मला समजेल अशा भाषेत समजावून सांगा. हे संस्कारातून आलेले नाही. हे त्या माणसाचे नवीन क्रियमाण आहे की ‘त्याने माझा अपमान केला. तरुणपणी २० व्या वर्षी केला.’ आजतागायत लक्षात राहते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : म्हणजे कुणी काही पटकन बोललेले आयुष्यभर लक्षात रहाते. असे का होते ? १५ सेकंदांत अहंला जी ठेच पोचलेली असते, ती आपल्या कायमस्वरूपी लक्षात का रहाते ? ते अहंच्या स्तरावर झालेले असते. त्यामुळे त्याचा परिणाम सूक्ष्म अंतर्मनापर्यंत जातो आणि तो दीर्घ काळ रहातो. बाकीचे बुद्धीच्या स्तरावर रहाते. त्यामुळे बुद्धीनुसार त्याचा कमी-जास्त भाग होत जातो. जेव्हा व्यक्तीला स्वतःचा अपमान लक्षात रहातो, तेव्हा ‘तिच्यात अहं खूप आहे’, हे लक्षात येते. आता मोठेपणी कुणी आपला अपमान केला, आपल्याला कुणी शिव्या दिल्या, तर त्याची काय किंमत आहे ? आपण दुर्लक्षच करतो ना ? संत-महात्म्यांना किती शिव्या दिल्या, तरी त्यांना त्याचे काही वाटत नाही; कारण त्यांच्यात अहं नसतो. ‘मला तो असं बोलला’, असा विचार ते करत नाहीत. त्यांना वाटते, ‘समोरच्याला काहीही बोलू दे. तो आणि त्याचे नशीब ! देव बघेल काय ते !’

पू. अनंत आठवले : नाही. मला कळले नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : म्हणजे मन, बुद्धी आणि अहं हे ३ स्तर बघितले, तर ‘वाचणे, लक्षात ठेवणे’, हे बुद्धीच्या स्तरावर होते. त्यामुळे त्याची मर्यादा अल्प रहाते. एखादा प्रसंग घडला, तर तो मनाच्या स्तरावर काही वर्षांपर्यंत रहातो, ती भावना जागृत रहाते आणि अपमान इत्यादी अहंच्या स्तरावर जाते. ते सूक्ष्म आणि अंतर्मनापर्यंत जाते. त्यामुळे त्याची वेदना कायमस्वरूपी रहाते, परिणाम रहातो. ज्याच्यात अहं नाही, जो साधनेत पुढे गेला आहे, तो त्या क्षणी ते विसरून जातो.

पू. अनंत आठवले यांच्या वाढदिवसाची नोंद दैनंदिनीत करतांना दैनंदिनीच्या त्या पृष्ठावरील सुवचनातून त्यांचेच गुणवर्णन केले असल्याचे लक्षात येऊन साधिकेची भावजागृती होणे

सौ. स्नेहल गांधी

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सनातनचे संत आणि अन्य संत यांच्या वाढदिवसानिमित्त ‘साधकांना संतांच्या चैतन्याचा लाभ व्हावा’, यासाठी ‘कोटी कोटी प्रणाम !’, अशी चौकट प्रसिद्ध करण्यात येते. मी दैनिक कार्यालयातील दैनंदिनीत ‘संतांचा वाढदिवस कधी असतो ?’, याची नोंद करण्याची सेवा करते. या सेवेच्या अंतर्गत मी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या वाढदिवसाची नोंद दैनंदिनीतील त्या दिनांकाच्या पृष्ठावर केली. त्यानंतर सहजच माझे लक्ष त्या पानावरील सुवचनाकडे गेले. तेथे लिहिले होते, ‘अनंत शक्ती, अनंत उत्साह, अनंत साहस आणि अनंत धीर यांच्या बळावर मोठमोठी कार्ये तडीस जात असतात.’ हे वाक्य वाचले आणि माझी भावजागृती झाली. पू. अनंत आठवले यांचे यापेक्षा सुंदर गुणवर्णन ते काय असणार !

हा भावजागृतीचा क्षण अनुभवायला दिल्याबद्दल पू. भाऊकाका आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. स्नेहल संतोष गांधी, फोंडा, गोवा. (१६.८.२०२५)

पू. अनंत आठवले : छान सांगितलेत. वेगळ्या शब्दात सांगतो. मनुष्याचे अंतःकरण हे मन, बुद्धी आणि अहंकार यांनी बनलेले आहे. त्यातील अहंकार हा आपल्यात ईश्वराचा अंश असलेल्या आत्म्याशी सर्वात अधिक (जास्ती) निकटचा आहे. हा अहंकार म्हणजे ‘मीपणा’ आत्म्याशी जोडलेलाच असतो. आपला जेव्हा अपमान होतो, तेव्हा त्याची ठेच आपल्या अहंकाराला लागते. जेव्हा सन्मान होतो, तेव्हा आपला अहंकार सुखावतो. या दोन्ही गोष्टींची जाणीव जीवात्म्याला झाल्याने आणि आत्मा नित्य असल्याने त्या घटनांचे विस्मरण होत नाही. आत्मज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव जीवात्म्यालाच होत असल्याने आत्मज्ञान झाले की, ते कधीही विस्मरणात जात नाही. आपण विद्यालय-महाविद्यालयात जे अध्ययन करताे ते बुद्धीने करत असतो. ते जीवात्म्याला भिडत नसल्याने विस्मरणात जाऊ शकते.

म्हातारपणी जे विस्मरण होते त्याचे कारण शारीरिक असते. त्याचा आत्म्याशी संबंध नाही.

(५.१०.२०२४ या दिवशी पू. अनंत आठवले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात झालेल्या संभाषणाचा निवडक भाग)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक