(म्हणे) ‘पुढच्या वेळी भारताच्या आतमध्ये युद्ध होईल !’ – Khawaja Asif

  • पाकिस्तानी संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची धमकी

  • असीम मुनीर यांनी अणूयुद्धाची धमकी दिल्याचे वृत्तही नाकारले

पाकिस्तानी संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पुढच्यावेळी युद्ध झाले, तर ते सीमेवर नव्हे, तर भारताच्या आत लढले जाईल, अशी धमकी पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली. या वेळी ख्वाजा यांनी पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेत अण्वस्त्र युद्धाची दिलेली धमकीचे वृत्त खोटे असल्याचेही त्यांनी सांगितले.

ख्वाजा आसिफ पुढे म्हणाले की, आता भारत आमच्या फील्ड मार्शलांच्या भाषणाविषयी खोटे सांगत आहे की, त्यांनी अण्वस्त्र वापरण्याचे विधान केले होते. तथापि असे विधान त्यांनी केले नाही. उलट भारताचे सैन्यदलप्रमुख म्हणाले आहेत की, पुन्हा एकदा युद्ध होईल. (याचाच अर्थ पाक कुरापत काढणार आणि मग भारत उत्तर देणार ! कारण भारत कधी स्वतःहून पाकवर आक्रमण करत नाही, हा इतिहास आहे ! वास्तविक ही मानसिकता भारताने पालटणे आवश्यक आहे ! – संपादक)

प्रत्येक पाकिस्तानी युद्धासाठी सिद्ध आहे ! – बिलावल भुट्टो झरदारी

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनीही भारताविरुद्ध गरळओक केली. सिंध सरकारच्या एका कार्यक्रमात जनतेला उद्देशून बिलावल भुट्टो म्हणाले की, भारताने सिंधू जल वाटप करारात पालट केल्यास युद्ध पेटेल. भारताने पाकिस्तानवर आक्रमण केले आहे. प्रत्येक पाकिस्तानी युद्धासाठी सिद्ध आहे. अलीकडील सैनिकी संघर्षाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने भारताला ऐतिहासिक उत्तर दिले आहे. (याला म्हणतात, ‘पडलो, तरी नाक वर !’ – संपादक) जर तुम्ही (भारत) ‘ऑपरेशन सिंदूर’सारखे आक्रमण करण्याचा विचार करत असाल, तर हे लक्षात ठेवा की, पाकिस्तानच्या प्रत्येक प्रांतातील लोक तुमच्याशी लढण्यासाठी सिद्ध आहेत. हे असे एक युद्ध असेल, ज्यात तुम्ही निश्चितच पराभूत व्हाल. पाकिस्तानी इतके सामर्थ्यशाली आहेत, की ते युद्ध करून सर्व नद्या परत मिळवू शकतात. पाकिस्तान कधीही झुकणार नाही.

संपादकीय भूमिका

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ करण्यापूर्वीही ख्वाजा आसिफ आणि अन्य पाकिस्तानी मंत्री वेगवेगळ्या दर्पाेक्त्या केल्या होत्या आणि प्रत्यक्षात भारताने कारवाई केल्यावर त्यांची तोंडे बंद झाली होती. हे सत्य लपवण्यासाठी आणि पाकिस्तानी जनतेला आणखी मूर्ख बनवण्यासाठी अशा प्रकारची विधाने ते आता करत आहेत !