IAF Chief : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने पाकिस्तानची ५ लढाऊ विमाने पाडली !

वायूदलप्रमुख ए.पी. सिंह यांची माहिती

वायूदलप्रमुख ए.पी. सिंह

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने पाकिस्तानची मोठी हानी केली. आम्ही त्यांची ५ लढाऊ विमाने आणि एक ‘अवाक्स’ (हवाई देखरेखेसाठी असलेले एक मोठे विमान) विमान पाडले, अशी माहिती वायूदलप्रमुख (एअर चीफ मार्शल) ए.पी. सिंह यांनी २ महिन्यांनी येथे एका कार्यक्रमात अधिकृतरित्या दिली. या वेळी त्यांनी आक्रमणांची काही छायाचित्रेही दाखवली.

एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह म्हणाले की,

१. आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने उत्तम काम केले आहे. आम्ही अलीकडेच खरेदी केलेली ‘एस्-४००’ हवाई संरक्षण प्रणाली निर्णायक ठरली आहे. पाकिस्तानकडे लांब पल्ल्याचे लक्ष्यित बाँब होते; पण ते त्यांपैकी एकही वापरू शकले नाहीत; कारण ते हवाई संरक्षणात भेदक होऊ शकत नव्हते.

२. विमानांव्यतिरिक्त आपण मोठ्या संख्येने युएव्ही (अनमॅन्ड एअर व्हेईकल – मानवरहित विमान) आणि ड्रोन्स हेही नष्ट केले. त्यांची काही क्षेपणास्त्रे आपल्या सीमेत पडली होती. आम्ही त्याचे अवशेष गोळा केले आहेत. या अवशेषांचा अभ्यास चालू आहे. जेणेकरून ती कुठून सोडण्यात आली ?, त्यांनी कोणता मार्ग अवलंबला होता ? क्षेपणास्त्र सोडणारी प्रणाली कशी आहे आणि त्याची क्षमता किती आहे ?, यांविषयी माहिती मिळू शकेल.

३. पाकिस्तानातील बहावलपूर येथे झालेल्या आक्रमणापूर्वीची आणि नंतरची छायाचित्र सर्वांसमोर आहेत. तिथे काहीही शेष राहिलेले नाही. ही छायाचित्रे केवळ उपग्रहावरून काढली गेली नाहीत. स्थानिक माध्यमांनी उद्ध्वस्त इमारतींच्या आतील छायाचित्रेही दाखवली आहेत.

४. या यशाचे एक प्रमुख कारण राजकीय इच्छाशक्ती होती. आम्हाला अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य होते. आम्ही किती दूर जायचे ?, हे ठरवत होतो. आम्हाला योजना आखण्याचे आणि कार्यवाही करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. तिन्ही दलांमध्ये समन्वय होता. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस् – तिन्ही सैन्यदलांचा प्रमुख) या पदामुळे खरोखरच फरक पडला. ते आम्हाला एकत्र आणण्यासाठी होते. सर्व यंत्रणांना एकत्र आणण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीही मोठी भूमिका बजावली.

५. हे एक उच्च तंत्रज्ञानाचे युद्ध होते. ८० ते ९० घंट्यांच्या युद्धात, आम्ही इतकी हानी करू शकलो की, त्यांना स्पष्टपणे जाणवले की, जर त्यांनी हे असेच चालू ठेवले, तर पाकला त्याची मोठी अधिक किंमत मोजावी लागेल; म्हणून त्याने माघार घेतली.

संपादकीय भूमिका

भारतीय सैन्याने केलेल्या या पराक्रमासाठी त्यांचे कितीही कौतुक केले, तरी ते अल्पच आहे ! आता त्यांना पूर्ण मोकळीक देऊन पाकला नष्ट करून भारतातील जिहादी आतंकवाद कायमचा नष्ट करावा, असेच भारतियांना वाटते !