Jaishankar Appeals To The World : आतंकवाद ही केवळ एका देशाची किंवा प्रदेशाची समस्या नाही !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे जगाला आवाहन !

ब्रुसेल्स येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

ब्रुसेल्स (बेल्जियम) : जगाने हे समजून घेतले पाहिजे की, आतंकवाद ही केवळ एका देशाची किंवा प्रदेशाची समस्या नाही, तर तो एक जागतिक धोका आहे, जो लवकरच किंवा नंतर सर्वांना प्रभावित करेल, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘ऑपरेशन सिंदूर’ ही आतंकवादाच्या विरोधातील भारताची कारवाई आहे !

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’कडे केवळ ‘भारत-पाकिस्तान सीमावाद’ म्हणून न पहाता आतंकवादाविरुद्ध भारताची कारवाई म्हणून पहावे, असे आवाहन परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना केले. ‘खरे सूत्र आतंकवाद असतांना आंतरराष्ट्रीय माध्यमे अनेक वेळा भारताच्या कृतीचा ‘सूड’ म्हणून उल्लेख करतात’, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

पाकने लादेनला लपवले होते !

जयशंकर पुढे म्हणाले की, ज्या देशात ओसामा बिन लादेनसारख्या आतंकवाद्याला अनेक वर्षे सैनिकी क्षेत्रात लपून ठेवण्यात आले होते, त्या देशावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

पाश्चिमात्त्य देशांनी जुन्या भूमिकेचा विचार करावा !

जयशंकर यांनी युरोपीय वृत्तसंस्था ‘युराॲक्टिव्ह’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, स्वातंत्र्यानंतर जेव्हा पाकिस्तानने भारतावर आक्रमणे केले, तेव्हा पाश्चिमात्य देश त्याच्या पाठीशी उभे राहिले. आज आंतरराष्ट्रीय तत्त्वांविषयी बोलणार्‍या देशांनी प्रथम त्यांच्या जुन्या भूमिकेचा विचार करावा.

युरोपीय देशांनी अमेरिकेकडे पाहू नये !

आता जग बहुध्रुवीय होत चालले आहे. युरोपलाही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे लागतील. युरोपने केवळ अमेरिका किंवा इतर देशांकडे पाहू नये, असे आवाहन जयशंकर यांनी केले.

भारत हा रशिया-युक्रेन युद्धाचा भाग नाही !

रशिया-युक्रेनविषयी जयशंकर म्हणाले की, भारत युद्धाद्वारे तोडगा काढण्यावर विश्वास ठेवत नाही. भारताचा असा विश्वास आहे की, मतभेद शस्त्रांनी नव्हे, तर संवादाने सोडवले पाहिजेत. भारत या युद्धाचा भाग नाही आणि भारताने काय करावे ?, हे ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही.

संपादकीय भूमिका

जगाला भारतात होणार्‍या आतंकवादाशी काहीही देणेघेणे नाही. ते केवळ स्वतःचाच विचार करतात. त्यामुळे भारताने जगाला आतंकवादाविषयी सांगत बसण्यापेक्षा भारतात आतंकवाद घडवणार्‍या पाकला नष्ट करण्याकडे लक्ष एकाग्र करणे आवश्यक आहे !