Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !

  • ७ जूनच्या रात्री इराणने इस्रायलवर डागली क्षेपणास्त्रे

  • इस्रायलने प्रत्युत्तरात इराणच्या १५ ठिकाणांना केले लक्ष्य

तेहरान / तेल अविव – आखाती देशांत गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेला तणाव पुन्हा भडकला. ७ जूनच्या रात्री उशिरा इराणने इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी आक्रमण केले. याला प्रत्युत्तर म्हणून काही घंट्यांतच इस्रायली सैन्याने त्याची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करून इराणवर आक्रमण केले.

युद्धासंदर्भात ६ ठळक घडामोडी !

१. इस्रायली संरक्षण दलाने सांगितले की, इस्रायली हवाई दलाने पश्चिम आणि मध्य इराणमधील सैनिकी लक्ष्यांवर आक्रमणे केली.

२. इराणी सैन्यानेही इस्रायली आक्रमणांना दुजोरा दिला आहे. त्याने सांगितले की, इस्रायलने हवाई मार्गाने डागल्या जाणार्‍या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करून इराणमधील जवळपास १५ ठिकाणांवर आक्रमणे केली. तेहरानमधील एका ड्रोन निर्मिती केंद्राचाही लक्ष्य केलेल्या ठिकाणांमध्ये समावेश होता.

३. स्थानिक इराणी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार तेहरान, तब्रिज आणि इस्फहान या भागांत स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.

४. इराणने राजधानी तेहरानमधील ‘इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळा’जवळ असलेले हवाई क्षेत्र बंद केले.

५. तिथे मध्य इस्रायलमधील अनेक भागांत सायरन वाजवण्यात आले. गुश डॅन, जेरुसलेम आणि आजूबाजूच्या भागांतील रहिवाशांना सतर्क रहाण्याची सूचना देण्यात आली आहे. संभाव्य आक्रमणाच्या धोक्यामुळे इस्रायलने त्याची हवाई हद्द तात्पुरती बंद केली आहे.

६. या सगळ्यात येमेनमधील हुती बंडखोर गटाने इराणच्या इस्रायलवरील क्षेपणास्त्र आक्रमणाचे उघडपणे समर्थन केले आहे.

अमेरिकेने दिले स्पष्टीकरण !

इराणवरील इस्रायली आक्रमणांमध्ये अमेरिकी सैन्याचा सहभाग नव्हता, असे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे. इस्रायली आक्रमणाची व्याप्ती तुलनेने मर्यादित होती, असेही अमेरिकी अधिकार्‍यांनी सांगितले. मुळात इराणच्या आक्रमणावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना प्रत्युत्तरदाखल कोणतीही कारवाई न करण्याचे आवाहन केले होते. इस्रायलचे पंतप्रधान या विनंतीस सहमत झाले होते, असे वृत्त ‘ॲक्सिओस’ या वृत्तसंस्थेने दिले होते. तथापि काही तासांतच इस्रायलकडून प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यात आली.

भारतीय दूतावासाचे भारतियांना त्वरित इराण सोडण्याचे आवाहन !

इराणमधील बिघडत चाललेल्या प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी नवीन सूचना (ॲडव्हायझरी) प्रसारित केली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतियांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला देत असतांनाच इराणमध्ये उपस्थित भारतीय नागरिकांना उपलब्ध वाहतूक साधनांचा वापर करून लवकरात लवकर इराण सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.