Amarnath Yatra Troop Deployment : अमरनाथ यात्रेला सुरक्षासेवा पुरवण्यासाठी निघालेल्या सैनिकांना प्रवासासाठी पाठवली अस्वच्छ रेल्वेगाडी !

सीमा सुरक्षादलाच्या सैनिकांच्या व्यवस्थेकडे रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

अगरताळा (त्रिपुरा) – भारतीय रेल्वेने अमरनाथ यात्रेला सुरक्षासेवा पुरवण्यासाठी निघालेल्या १ सहस्र २०० ‘बी.एस्.एफ्.’च्या (सीमा सुरक्षा दलाच्या) सैनिकांना सेवेच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी जीर्ण रेल्वेगाडी पाठवली. रेल्वेगाडीची जीर्ण अवस्था पाहून सैनिकांनी त्यात चढण्यास नकार दिला. गाडीच्या खिडक्या, दरवाजे, विद्युत् उपकरणे आणि शौचालये सर्व जीर्ण अवस्थेत होते. सैनिकांच्या निषेधानंतर ४ दिवसांनी भारतीय रेल्वेने दुसरी रेल्वेगाडी उपलब्ध करून दिली. सैनिकांना अमरनाथ यात्रेकरूंना सेवा पुरवण्यासाठी काश्मीरला पोचायचे होते.

१. ही विशेष रेल्वेगाडी ६ जून या दिवशी त्रिपुर्‍यातील उदयपूर रेल्वेस्थानक येथून जम्मू तवी रेल्वेस्थानकाला रवाना होणार होती.

२. सीमा सुरक्षा दलाच्या कमांडरने उदयपूरहून धावणार्‍या विशेष रेल्वेगाडीची तपासणी केली असता ती सैनिकांच्या सुरक्षेसाठी आणि इतर आवश्यकतांसाठी योग्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ती गाडी रहित करण्यात आली.

३. अशा परिस्थितीत अमरनाथ यात्रेसाठी सैनिकांची तैनातीसुद्धा उशिराने झाली आहे. (या कालावधीत जर अमरनाथ येथे आतंकवादी आक्रमण झाले, तर त्याचे उत्तरदायित्व निश्‍चित करणे आवश्यक आहे ! – संपादक) यापूर्वी या सैनिकांना १२ जूनपर्यंत काश्मीरमध्ये तैनात करण्यात येणार होते.

संपादकीय भूमिका

‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात पाकने जम्मू-काश्मीरमधील रहिवासी क्षेत्रांवर आक्रमण केल्यावर सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी एकेरी लढा देत त्यांचे ११८ तळ उद्ध्वस्त केले होते. असे असतांना त्यांना अशा प्रकारे कृतघ्नतेची वागणूक देणार्‍या रेल्वे विभागातील संबंधित अधिकार्‍यांना निलंबित केले पाहिजे !