ख्रिस्ती धर्मांतरितांना मूळ हिंदु धर्मात आणणारे छत्तीसगडचे प्रबल प्रताप सिंह जुदेव !

‘गेल्या अनेक वर्षांपासून गरीब, वनवासी, तसेच भोळ्या हिंदूंना विविध प्रलोभने दाखवून त्यांच्या मनात हिंदु धर्म आणि देवता यांच्याविषयी घृणा निर्माण केली जाते अन् त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. अशाच प्रकारे छत्तीसगडच्या दुर्गम भागातील हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले आहे. या धर्मांतरीत ख्रिस्तींना मूळ हिंदु धर्मात परत घेण्याचे कार्य जशपूर राजघराण्याचे सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे छत्तीसगड प्रदेश मंत्री श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव करत आहेत. ते माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिलीप सिंह जुदेव यांचे पुत्र आहेत, ज्यांनी ‘घरवापसी’ (धर्मांतरित हिंदूंना मूळ धर्मात परत घेणे)च्या माध्यमातून धर्मांतराविरुद्ध संघर्ष केला होता. श्री. प्रबल प्रताप सिंह यांनी त्यांच्या वडिलांची परंपरा पुढे चालवत छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये १० सहस्रांहून अधिक लोकांची ‘घरवापसी’ केली आहे. ते स्वत: गंगा नदीच्या पाण्याने लोकांचे चरण धुऊन त्यांना आपल्या धर्मात परत घेतात. ते धर्मशिक्षण, पर्यावरण संरक्षण, गोरक्षण आणि सामाजिक समरसता यांचे कार्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ‘घरवापसी’चे कार्य करतांना त्यांना धमक्या मिळाल्या आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आक्रमणेही झाली आहेत, तरीही मागे न हटता ते हे कार्य जोमाने पुढे नेत आहेत. ‘जोपर्यंत शेवटच्या धर्मांतरित हिंदूंची ‘घरवापसी’ (शुद्धीकरण) होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष करत राहू’, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. 

श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव

विशेष सदर


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. प्रबल प्रताप सिंह जुदेव ‘घरवापसी’ उपक्रमाकडे कसे वळले ? 

छत्तीसगडमधील जशपूर घराण्याचे दिवंगत दिलीप सिंह हे राजा होते. वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले दिलीप सिंह जुदेव हे ख्रिस्ती धर्मांतर केलेल्या आदिवासी लोकांचे पाय धुऊन त्यांना मूळ हिंदु धर्मात परत आणण्याचे कार्य करत होते. ऑगस्ट २०१३ मध्ये त्यांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांची परंपरा पुत्र श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव पुढे चालवत आहेत.

२. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या छत्तीसगडमधील ‘घरवापसी’ची काही उदाहरणे !

अ. ‘छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यात ख्रिस्ती झालेल्या ६५१ कुटुंबांनी नुकताच हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या पुढाकाराने हा ‘घरवापसी’ कार्यक्रम झाला.

आ. ‘महासमुंद जिल्ह्यातील बसना येथे १ सहस्र १०० धर्मांतरित ख्रिस्त्यांनी मूळ हिंदु धर्मात प्रवेश केला. तेथे आयोजित श्रीमद्भागवत कथेच्या वेळी श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी गंगेच्या पाण्याने पाय धुऊन त्यांना हिंदु धर्मात परत आणले.

इ. बलरामपूर जिल्ह्यातील कांद्री येथे प्रबल श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या नेतृत्वाखाली अन्य पंथातील ५० कुटुंबांतील १२० लोकांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.

ई. श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या नेतृत्वाखाली जशपूर जिल्ह्यातील खुंटापानी येथे छत्तीसगडमधील ४०० कुटुंबांमधील १ सहस्र २०० लोकांनी परत हिंदु धर्म स्वीकारला.

उ. कटंगपाली गावात श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी गंगेच्या पाण्याने पाय धुऊन १ सहस्र २५० लोकांना ख्रिस्ती धर्मातून सनातन धर्मात रूपांतरित केले.

ऊ. श्री. जुदेव यांच्या पुढाकाराने कोरबा येथे १०१ कुटुंबे सनातन धर्मात परतली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते प्रबल प्रताप सिंह जुदेव यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार प्रदान !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार स्वीकारतांना प्रबल प्रताप सिंह जुदेव

१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांना ते करत असलेल्या कार्याप्रती ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे दिले आहे.

धर्मांतरितांची घरवापसी करण्यासाठी हिंदूंनी प्राणपणाने प्रयत्न करावेत ! – प्रबल प्रताप सिंह जुदेव, प्रदेश मंत्री, भाजप, छत्तीसगड

समाजात हिंदु धर्माची नाचक्की करण्याचे प्रयत्न चालू आहेत. ख्रिस्ती सेवेच्या नावाखाली धर्मांतर करत आहेत. समाजातील भेदभाव, जातपात, उच्च-नीचता हटवून धर्मांतर झालेल्यांची पुन्हा घरवापसी केली पाहिजे. हिंदू भक्कम झाल्यास देश भक्कम होईल. तेव्हाच धर्म सुरक्षित राहील. ‘हिंदू घटा, तो देश बटा’ (हिंदूंची संख्या घटल्यास देशाचे विभाजन होईल). धर्मांतरित झालेल्यांची घरवापसी करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करण्याचा संकल्प हिंदूंनी केला पाहिजे.

३. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांचे धर्मजागृतीपर विचार

श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव

शिक्षण आणि अन्य सेवा यांच्या नावाखाली व्यापार केला जात असून नियोजनबद्ध रितीने हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर आहे. त्यामुळे हा विषय अतिशय गंभीर आहे. देशातील अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा लागू केला असला, तरी तो देशभर लागू करून त्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक आहे.

  • ‘हिंदूंची संख्या न्यून होते, तेव्हा देशाचे तुकडे होतात’, याचा इतिहास साक्ष आहे.
  • छत्तीसगड येथील ज्या भागांमध्ये हिंदूंचे धर्मांतर झाले आहे, तेथे नक्षली कारवाया वाढल्या आहेत. धर्मांतर झालेल्या ठिकाणी भारतमातेविषयीची आत्मीयता नष्ट होते.
  • गीता, गोमाता आणि गंगामाता असलेल्या देशात आयात धर्माची आवश्यकताच नाही.
  • ‘धर्मांतरित लोकांना मतपेढी बनवा आणि राज्य करा’, हे काँग्रेसचे स्पष्ट धोरण राहिले आहे. त्यामुळे जेथे जेथे काँग्रेसचे सरकार आहे, तेथे तेथे हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर होते.

प्रबल प्रताप सिंह जुदेव यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार मिळाल्याविषयी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे गौरवोद्गार !

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्याची माहिती श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर प्रसारित केली. त्यावर ‘गोव्यात आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या शुभ मुहूर्तावर श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव ‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराने सन्मानित होणे, ही आपल्या सर्वांसाठी पुष्कळ आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे’, या शब्दांत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी ‘एक्स’वर ‘रिट्वीट’ करून गौरवोद्गार काढले.

ते पुढे म्हणाले की, हे स्वर्गीय दिलीप सिंह जुदेव यांनी केलेली तपश्चर्या, त्याग आणि धर्माप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक आहे. ‘घरवापसी’ मोहिमेचा वारसा दिलीप सिंग जुदेव यांच्याकडून मिळालेला आहे, तो श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी नवीन ऊर्जेने आणि दृढनिश्चयाने पुढे नेला आहे. सहस्रो लोकांना सनातन धर्मात पुन्हा स्थापित करून समाजात सांस्कृतिक पुनर्जागरणाची ठिणगी निर्माण झाली आहे. त्यांची ही कामगिरी सनातनींसाठी प्रेरणास्रोत आहे.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷