सनातन म्हणजे वाईट, खरे पुरोमागित्व म्हणजे संस्कृतीला शिव्या देणे, असा चुकीचा विचार पुढे आला ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे – धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपल्याकडे निधर्मी राज्याचे प्रयत्न झाले. त्यातून आपल्या प्रथा आणि परंपरा यांविषयी गैरसमज निर्माण केले. सनातन म्हणजे वाईट आणि खरे पुरोगामित्व म्हणजे संस्कृतीला शिव्या देणे, असा विचार पुढे आला. त्यामुळे अनेक पिढ्यांना खरा इतिहासही माहिती नाही, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. ते श्री. प्रशांत पोळ लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की,

१. भारतीय समाजाचे आत्मभान नष्ट करण्यासाठी आक्रमकांनी ज्ञानकेंद्रे आणि प्रतिके नष्ट केली. गेली ७०० ते ८०० वर्षे आक्रमकांच्या ज्ञानाचा पगडा आपल्यावर बसावा, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केला जात आहे.

२. जगातील अन्य संस्कृती नष्ट झाल्या आहेत. पूर्वीपासून असलेली आपल्या देशाची संस्कृती आजही अखंडित आहे.

३. युरोपियन देशात जेव्हा संस्कृतीची संकल्पना नव्हती, तेव्हा आपली संस्कृती विकसित होती, संस्कृत भाषा विकसित होती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदु मंदिरे, प्रतिके यांचे पुनरुज्जीवन केले ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेली मंदिरे, घाट यांचे पुनर्निर्माण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले. त्यांनी २८ वर्षे राज्यकारभार केला. हिंदु धर्माची प्रतिके असलेले घाट, ज्योतिर्लिंगे, शक्तीस्थळे यांचे, तसेच भारतीय संस्कृतीचे रक्षण केले. काशी विश्वेश्वर मंदिराचे पुनर्निर्माण केले. शस्त्रनिर्मितीचा पहिला कारखाना चालू केला. महिलांना सैन्यात स्थान देऊन महिलांची पहिली तुकडी स्थापन केली, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ते पुण्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रमामध्ये बोलत होते.