India Fourth Largest Economy : भारत बनला जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था !

नीती आयोगाने केली घोषणा !

नवी देहली – चौथी जागतिक अर्थव्यवस्था असणार्‍या जपानला मागे टाकत पाचवी अर्थव्यवस्था असणारा भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, अशी माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर्. सुब्रह्मण्यम् यांनी दिली. नीती आयोगाच्या १० व्या बैठकीनंतर सुब्रह्मण्यम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. भारताच्या पुढे आता अमेरिका, चीन आणि जर्मनी हे देश आहेत.

पुढील ३ वर्षांत भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार !


आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माहितीचा संदर्भ देत बी.व्ही.आर्. सुब्रह्मण्यम् म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था आता ४ ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे. भारत आता जपानच्या पुढे गेला आहे. आपण आपल्या चालू योजनांवर, विकासाच्या गतीवर कायम राहिलो, तर येत्या अडीच ते तीन वर्षांमध्ये आपण जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.

वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम करा ! – पंतप्रधान मोदी यांचे राज्यांना आवाहन

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २४ मे या दिवशी येथील ‘भारत मंडपम्’ येथे नीती आयोगाच्या बैठकीत त्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या प्रतिनिधींना वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.

त्यानंतर एका सभेला संबोधित करतांना मोदी यांनी राष्ट्रीय विकासात सामूहिक आणि सामाजिक विकास यांवर जोर दिला.

जागतिक अस्थिरतेमध्ये भारताने पुढे जाणे, ही मोठी घटना !

जगात युद्धाची स्थिती, अमेरिकेने अनेक देशांवर आयात शुल्क लादणे, मंदीचे सावट आदी गोष्टींचे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था पुढे जात असल्याचे यातून दिसून येत आहे. या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने जपानला मागे टाकणे, ही मोठी घटना मानली जात आहे.

संपादकीय भूमिका

भारतीय अर्थव्यवस्थेने पहिला क्रमांक मिळवावा, असे प्रत्येक भारतियाला वाटणारच; मात्र त्याच वेळी देशातील महागाई, भ्रष्टाचार आदी समस्या दूर करून नागरिकांना सुखाने जगता येण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत, असेही जनतेला वाटते !