India-Pak War: पाकने भारताला धडा शिकवला असेल, तर त्याचे पुरावे दाखवा ! – यू ट्यूब चॅनलचे पत्रकार अहमद नुरानी

पाकिस्तानातील पत्रकाराची पाक सरकारकडे विचारणा !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकचे कंबरडे मोडल्यानंतरही ‘पडलो, तरी नाक वर’ या वृत्तीच्या पाकने भारताला धडा शिकवल्याच्या कल्पनेतून पाकमध्ये राष्ट्रीय उत्सव साजरा केला; मात्र पाकमधील काही पत्रकार, यू ट्यूब चॅनल चालवणारे, तसेच संरक्षणतज्ञ पाकला आरसा दाखवत यावरून प्रश्‍न विचारत  आहेत. त्यांनी पाक सरकारला ‘जर पाकने भारताला धडा शिकवला असेल, भारताची हानी केली असेल, तर त्याचे पुरावे दाखवा’, अशी ‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर’, अशा शब्दांत विचारणा केली आहे.

भारताची हानी केल्याचे पुरावे आहेत का ? – यू ट्यूब चॅनलचे पत्रकार अहमद नुरानी यांचा पाक सरकारला प्रश्‍न

‘त्यांनी (भारताने) तुमच्या (पाकच्या) ४ प्रमुख शहरांमध्ये लक्ष्यांवर आक्रमण केले आहे, १२ हून अधिक लोक मारले आहेत. असे असतांना आम्ही त्यांचे लक्ष्य उद्ध्वस्त केल्याचा दावा करणे, हे विचित्र आहे. तुम्ही तुमच्या मुलांना मूर्ख बनवत आहात. जेव्हा भारताने आपल्या वायूदलाच्या तळावर आक्रमण केले, तेव्हा तुम्हीही आक्रमण केले; पण तुम्ही लक्ष्यांवर मारा केला का ? याची काही माहिती आहे का ?, त्याचे काही पुरावे आहेत का ? दुसर्‍या बाजूची हानी झाली, याचे पुरावे आहेत का ?’, असे प्रश्‍न पाकिस्तानी पत्रकार आणि यू ट्यूब चॅनल असणारे अहमद नुरानी यांनी विचारले आहेत. विशेष म्हणजे नुरानी यांचे काही व्हिडिओ पाकिस्तानी सरकारने ब्लॉक केले आहेत.

भारतीय ड्रोनमुळे असंख्य लोकांचे प्राण गेले !

नुरानी यांनी म्हटले की, आपल्याकडे पुरावे नसतील, तरी दुसर्‍या बाजूने (भारताने) झालेल्या आक्रमणामुळे झालेल्या हानीचे पुरावे आहेत. शेकडो भारतीय ड्रोन पाकिस्तानच्या सर्व लहान-मोठ्या शहरांमध्ये आले, ते त्यांचे काम करत राहिले, हे ड्रोन  त्यांना हवे तिथे पोचले. रावळपिंडीतील स्टेडियम असो किंवा अटकजवळ – तेथे अनेक लोक ठार झाले. ड्रोनमुळे असंख्य लोकांचे प्राण गेले. संपूर्ण पाकिस्तानात भीतीचे वातावरण होते. मी तुम्हाला एक तथ्य सांगू इच्छितो, तुम्ही मला देशद्रोही म्हणू शकता, सहस्रो वेळा म्हणू शकता. गोष्ट अशी आहे की, जर तुम्ही तथ्यांचे पालन केले नाही, तर तुम्ही कोणतीही सुधारणा घडवून आणू शकणार नाही.

संपादकीय भूमिका

पाककडे दाखवण्यासारखे काहीच नाही; कारण असे काहीच झालेले नाही. पाक जगातील सर्वांत खोटारडा देश आहे. त्याचा खोटेपणा त्याच्याच देशाचे पत्रकार उघड करून त्याचे धिंडवडे काढत आहेत !